ChatGPT-4 : ‘चॅटजीपीटी-4’ने भारताबद्दल ‘हे’ सांगितले… | पुढारी

ChatGPT-4 : ‘चॅटजीपीटी-4’ने भारताबद्दल ‘हे’ सांगितले...

‘ओपन एआय’ या कंपनीने ‘चॅटजीपीटी’ आणले आहे याची आपल्याला कल्पना असेलच. कंपनीने अलीकडेच ‘चॅटजीपीटी-4’ लाँच केले आहे, जे आधीच्या चॅटबॉटपेक्षा अधिक प्रगत असल्याचा दावा केला जात आहे. ‘चॅटजीपीटी’च्या क्षमतांचा सखोल अभ्यास करण्यासाठी
‘मिंट’ ने त्याला एक प्रश्न विचारला होता. यामध्ये भारताबद्दलच्या 10 अशा गोष्टी विचारल्या ज्या कमी लोकांना माहिती आहेत. ‘मिंट’ने चॅटजीपीटीला विचारलेल्या प्रश्नामध्ये चॅटबॉटने काय उत्तर दिले आहे ते जाणून घेऊयात.

भारत हा असा एक देश आहे ज्यामध्ये सर्वात मोठे कुटुंब राहते. मिझोराम राज्यातील झिओना चना या व्यक्तीला 39 बायका, 94 मुले आणि 33 नातवंडे आहेत. 2021 मध्ये झिओना चना या व्यक्तीचे निधन झाले आहे. जगातील भारत हा असा एकमेव देश आहे की जिथे 1,50,00 पेक्षा जास्त पोस्ट ऑफिसेस आहेत. हे जगातील सर्वात मोठे पोस्टल नेटवर्क आहे. तसेच जगातील एकमेव फ्लोटिंग पोस्ट ऑफिस देखील भारतातच आहे. हे फ्लोटिंग पोस्ट ऑफिस जम्मू-काश्मीर येथील दल सरोवरात आहे.

भारत देश विविधतेने नटलेला देश आहे. चॅटजीपीटीने भारताच्या 10 गोष्टी सांगताना एक अशी गोष्ट सांगितली जी फार कमी लोकांना माहिती असेल. ती गोष्ट म्हणजे जगातील एकमेव हत्तींचे स्पा सेंटर हे भारतामध्ये आहे. केरळ राज्यातील पुन्नाथूर कोट्टा एलिफंट यार्ड रिजुवेनेशन सेंटरमध्ये हत्तींना आंघोळ घातली जाते. तसेच त्यांना खायला आणि मॉलिश देखील केले जाते. निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची गोष्ट चॅटजीपीटीने सांगितली आहे. मतदान हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. गुजरातमधील गीरच्या जंगलात एक मंदिर आहे. महंत भरतदास हे दर्शनदास त्या मंदिराचे काळजीवाहू म्हणून काम पाहतात. निवडणूक आयोगाने त्यांचा मतदानाचा हक्क हिरावला जाऊ नये म्हणून गीरच्या जंगलात त्या एका व्यक्तीसाठी मतदान केंद्र तयार केले होते.

कबड्डी या खेळाची सुरुवात भारतात झाली आहे. भारतीय राष्ट्रीय कबड्डी संघाने 2004 मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेपासून ते आतापर्यंतचे सर्व विश्वचषक जिंकले आहेत. भारतातील महाराष्ट्र राज्यात असे एक गाव आहे. ज्या गावामध्ये एकही घराला दरवाजाच नाही. इतकेच नव्हे तर तिथल्या बँकेला सुद्धा दरवाजे नाही आहेत. त्या गावाचे नाव शनी शिंगणापूर असे आहे. येथे प्रसिद्ध असे शनी मंदिर आहे. शनिदेव त्या गावाचे रक्षण करतात. जरी कोणी त्या गावात चोरी करण्याचा प्रयत्न केला तरी शनिदेव त्याला शिक्षा करतात अशी इथल्या लोकांची भावना आहे.

रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय आहेत. रवींद्रनाथ टागोर यांनी भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांचे राष्ट्रगीत लिहिले आहे. रवींद्रनाथ टागोरांनी ‘जन गण मन’ हे भारताचे व ‘अमर सोनार बांग्ला’ हे बांगलादेशचे राष्ट्रगीत लिहिले आहे.
कुंभमेळा म्हणजे ठराविक काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे. हा मेळा दर तीन वर्षांनी एकदा अशा पद्धतीने बारा वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या ठिकाणी होतो. या कुंभ मेळ्यामध्ये करोडो लोक सहभागी होत असतात. यामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात गर्दी असते हा मेळा अंतराळातून देखील पाहता येतो. भारताचे पहिले रॉकेट हे 1963 मध्ये सायकलवरून लाँच करण्यात आले होते. रॉकेटला थुंबा लाँचिंग स्टेशनपासून 9 कि.मी. अंतरावर असलेल्या रॉकेट लाँचिंग पॅडवर नेण्यात आले होते. भारतातील अनेक ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, मेघालय राज्यातील एक गाव आहे. जगातील हे असे एकमात्र गाव आहे की तिथे सर्वात जास्त प्रमाणात पाऊस पडतो. या गावाचे नाव ‘मॉसिनराम’ असे आहे.

Back to top button