हिंगोली : दोन ट्रकच्या धडकेत ५ जण ठार, १५० मेंढ्या दगावल्या; चालकाला डुलकी लागल्याने अपघात | पुढारी

हिंगोली : दोन ट्रकच्या धडकेत ५ जण ठार, १५० मेंढ्या दगावल्या; चालकाला डुलकी लागल्याने अपघात

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : दोन ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत ५ जण ठार तर १५० मेंढ्या दगावल्याची घटना आज (दि.२५) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर माळेगाव फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. सलमान आली मौला, अली, सत्यनारायण बळाई, लालू मीना, कदीर मेवाती, आलम अली अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. यातील एक जण राजस्थानमधील तर इतर चौघेजण मध्यप्रदेशातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राजस्थान येथील ट्रक (एचआर- ५५-एजे-३१११ ) २०० मेंढ्यांना घेऊन हैदराबादकडे निघाला होता. या ट्रकमध्ये ट्रकचालकासह चौघेजण केबिनमध्ये बसले होते. तर, एक व्यक्ती पाठीमागे मेंढयांसोबत बसला होता. हा ट्रक माळेगाव फाट्याजवळ आला असताना उड्डाणपुलाखाली ट्रक चालकाला डूलकी लागली. अशात हा ट्रक समोर उभा असलेल्या ट्रकवर आदळला. या अपघातामध्ये ट्रकमधील तिघेजण जागीच ठार झाले. तर, दोन जण गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचाही मृत्यू झाला. तसेच, दीडशे मेंढ्या दगावल्या. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा शहारे, जमादार दिलीप पोले, संजय राठोड, इंगोले, गजानन होळकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील दोन्ही जखमींना उपचारासाठी कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. अपघातामध्ये जागीच ठार झालेल्या तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. अपघातातील एका जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : 

Back to top button