Kharge Calls Kejriwal : सीबीआय चौकशीच्या आधी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली केजरीवाल यांच्याशी चर्चा
नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना सीबीआयचे समन्स मिळाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केजरीवालांशी फोनवर संवाद साधला. शुक्रवारीच दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. विरोधकांची एकजूट करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून दोन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा झाल्याचे मानले जात आहे. दिल्ली दारू घोटाळ्यासंदर्भात चौकशीसाठी सीबीआयने केजरीवाल यांना समन्स बजावले आहे. केजरीवाल यांची १६ एप्रिलला चौकशी होणार आहे. (Kharge Calls Kejriwal)
तत्पूर्वी केजरीवाल यांनी शनिवारी सांगितले की, आम आदमी पक्ष देशासाठी आशेचा किरण म्हणून उदयास आला आहे आणि त्यामुळेच त्याला चिरडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे सीबीआयने केजरीवाल यांना अबकारी धोरण प्रकरणी चौकशीसाठी रविवारी बोलावले आहे. यावर सर्वप्रथम प्रतिक्रिया देताना केजरीवाल यांनी रविवारी एजन्सीसमोर हजर होणार असल्याचे सांगितले. दिल्लीत पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, गेल्या ७५ वर्षांत ‘आप’सारखं कोणत्याही पक्षाला लक्ष्य करण्यात आलेलं नाही. (Kharge Calls Kejriwal)
केजरीवाल म्हणाले की, उत्पादन शुल्क धोरण हे उत्कृष्ट धोरण आहे आणि ते आप सत्तेत असलेल्या पंजाबमध्ये त्याची चांगली अंमलबजावणी होत आहे. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयावर (ईडी) खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा आरोप यावेळी केजरीवाल यांनी केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, ४०० हून अधिक छापे टाकण्यात आले पण पैसे कुठे आहेत. गोव्याच्या निवडणुकीत हा पैसा वापरण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांनी गोव्यातील प्रत्येक विक्रेत्याकडे चौकशी केली ज्यांना आम्ही नोकरी दिली होती. मात्र त्यांना काहीही सापडले नाही. अबकारी धोरणात भ्रष्टाचाराचा प्रश्नच येत नसल्याचे केजरीवाल म्हणाले.
अधिक वाचा :