पुणे : दोन यंत्रणांचा पत्रव्यवहार हा वाद नव्हे: बीआरटीबाबत चंद्रकांत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण
![BJP meeting for chinchwad vidhansabha constituency election pune](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2022/09/03073608/Capture-42.jpg)
पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील वाहतूक कोंडीला बीआरटी जबाबदार असून, ती बंद करा, अशी सूचना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना केली होती. पत्रव्यवहार बाहेर आल्यानंतर गदारोळ झाला. त्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिका मांडली आहे. ‘दोन आयुक्तांनी केलेला पत्रव्यवहार हा कागदावर आला आहे, त्याला वाद म्हणता येणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘महापालिका आणि पोलिस आयुक्त यांच्यात काहीही वाद नाही. सरकारी कामात काही बाबी सांगण्यासाठी त्या कागदावर आणाव्या लागतात, तसे त्यांनी केले आहे. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिस आयुक्तांना काही पर्याय सुचले आहेत, ते त्यांनी कागदावर मांडले आहेत. पुण्यातील 400 किलोमीटर रस्त्यांच्या कामांबाबत ठरले आहे, त्यानुसारच पोलिस आयुक्तांनी हे विषय पत्रातून मांडले आहेत. बैठकीत ठरल्याप्रमाणे अंमलबजावणीसाठी पत्र पाठवले आहे, असे त्यांनी सांगितले.
पोलिस आयुक्तांनी बीआरटी मार्ग बंद करावा, अशी सूचना केली आहे. त्याबाबत पाटील म्हणाले, ‘पुण्यातील वाहतूक कोंडीचे समर्थन करणार नाही. मुंबईतही विविध विकासकामांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पुण्यातही मेट्रो, जायका, पाइपलाइनने गॅस पुरवठा, असे प्रकल्प सुरू आहेत. विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामामुळे सहा लेनचा रस्ता तीन लेनचा झाला आहे, त्यामुळे कोंडी होत आहे. हे वाहतूक कोंडीचे समर्थन नाही. यावर उपाय म्हणून काय करणार आहोत याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, परिस्थितीमुळे तयार झालेली कोंडी लक्षात घ्यायला हवी.’