लंडन; वृत्तसंस्था : युरोपियन अंतराळ संस्थेच्या कोपर्निकस सेन्टीनल 2 या उपग्रहाने पृथ्वीभोवती फेरी मारत असताना कोट्यवधी भारतीयांची श्रद्धा असलेल्या भारत आणि श्रीलंका यांना जोडणार्या 48 कि.मी. लांबीच्या रामसेतूची सुस्पष्ट आणि रेखीव छायाचित्रे टिपली आहेत. याच मार्गावरून प्रभू श्रीराम रावणाचा निःपात करण्यासाठी लंकेत गेले होते, अशी तमाम हिंदूंची श्रद्धा आहे.
पृथ्वीवरील हवामानाच्या नोंदी व बदल टिपण्यासाठी सोडण्यात आलेल्या कोपर्निकस सेंन्टिनल 2 या उपग्रहाने नुकतीच या रामसेतूची छायाचित्रे टिपली.
गर्द निळ्या समुद्रात भारत आणि श्रीलंकेला जोडणार्या या पुलाच्या आसपासचा काही भाग उथळ असून त्या भागातील रंगही फिका निळा झाल्याचे या छायाचित्रांत स्पष्ट दिसते.
भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते हे सारे चुनखडीचे दगड असून हा पूल 15 व्या शतकापर्यंत ये-जा करण्याइतपत समुद्र पातळीच्या वर होता.
कालांतराने अनेक वादळांनी जमिनीची धूप झाली आणि हा पूल पाण्याखाली गेला.
भारताच्या दक्षिण टोकाला असलेले रामेश्वरम बेट आणि श्रीलंकेच्या उत्तर भागातील मन्नारचे बेट यांना जोडणारा हा 48 कि.मी.चा पूल आहे. हिंदी महासागरातील मन्नारचे आखात आणि बंगालच्या उपसागरातील पाल्कची सामुद्रधुनी यांना वेगळे करणारी ही सीमारेषा आहे.
पौराणिकदृष्ट्या या रामसेतूचे तमाम भारतीयांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम सीतामातेची सुटका करण्यासाठी व रावणाचा निःपात करण्यासाठी किनार्यावर आले असताना वानरसेनेने त्यांच्या लंकेतील प्रवेशासाठी हा पूल तयार केला होता अशी श्रद्धा आहे.