![Three drowned while swimming in Panganga river](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2F88aac009-923d-4c76-a114-6768a10749e9%2FUntitled_design___2024_06_26T165411_789.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
उमरखेड: पुढारी वृत्तसेवा: कपडे धुतल्यानंतर पैनगंगा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाला. तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला. तर एक अत्यवस्थ आहे. ही दुर्दैवी घटना सावळेश्वर येथे आज (दि.२६) दुपारी १२. ३० च्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अवंतिका राहुल पाटील (वय १३, सावळेश्वर), कावेरी गौतम मुनेश्वर (वय १५, रा. बाभळी, ता. हदगाव), चैतन्य देवानंद काळबांडे (वय १७, रा. सावळेश्वर) अशी मृतांची नाव आहेत. तर शुभम सिद्धार्थ काळबांडे (वय २२, रा. सावळेश्वर) हा अत्यवस्थ असल्याने त्याला उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सावळेश्वर गावाजवळील नदीपात्रात कपडे धुण्यासाठी अवंतिका पाटील व कावेरी मुनेश्वर गेल्या होत्या. कपडे धुतल्यानंतर पोहण्यासाठी त्या नदीपात्रात उतरल्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या बुडू लागल्या. त्यावेळी काठावर उभे असलेल्या चैतन्य काळबांडे व शुभम काळबांडे यांनी त्यांना वाचविण्यासाठी नदीत उड्या मारल्या. परंतु, त्यांना सुद्धा पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले.
त्यावेळी महिलांनी गावाकडे धाव घेत आरडाओरड केली. त्यानंतर विवेक रावते, शेख अजीम यांच्यासह तरुणांनी नदीकडे धाव घेतली. परंतु, कावेरी मुनेश्वर हिचा जागीच मृ्त्यू झाला. तर अवंतिका व चैतन्य यांना ढाणकी येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. तर शुभम काळबांडे हा अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले. कावेरी गौतम मुनेश्वर ही मामाच्या घरी राहण्यासाठी आली असताना तिचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने सावळेश्वर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.