कोरोनाच्या दुस-या लाटेत ६४६ डॉक्टरांचा मृत्यू!
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
देशात कोरोनाची दुसरी लाट हाहाकार माजवला. सध्या ही लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. पण त्यानंतर कोरोनाची तिसरी लाटा येईल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. दरम्यान कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला. जो पहिल्या लाटेतील मृत्यू दरापेक्षा अधिक असल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ६४६ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशननं सांगितले आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये देशातील डॉक्टर्सनी कंबर कसली आहे. त्यातचबरोबर वैद्यकीय कर्मचारी, पोलिस प्रशासनही आघाडीवर आहेत. मात्र, कोरोनाचा फटका त्यांनाही बसला आहे. कोरोना संसर्गाने देशातील विविध राज्यांमध्ये ६४६ डॉक्टरांचा रुग्णांची सेवा करताना मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक डॉक्टरांचे मृत्यू हे दिल्ली येथे झाले आहे. त्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. दिल्लीत १०९, बिहारमध्ये ९७, उत्तर प्रदेशात ७९, राजस्थानमध्ये ४३, झारखंडमध्ये ३९, गुजरातमध्ये ३७, आंध्र प्रदेशमध्ये ३५, तेलंगाणा ३४, तामिळनाडूत ३२, पश्चिम बंगालमध्ये ३०,महाराष्ट्रमध्ये २३, ओडिशामध्ये २३, मध्य प्रदेशात १६ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती आयएमएने दिली आहे.
दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला. कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात टाकून रुग्णांची दिवस-रात्र सेवा करत होते.
A total of 646 doctors died in the second wave of COVID-19: Indian Medical Association pic.twitter.com/RF5Yw355zw
— ANI (@ANI) June 5, 2021
मागील काही दिवसांमध्ये संपूर्ण देशातील कोरोना रुग्णवाढीत घट होत आहे; पण रुग्णांचा होणार्या मृत्यूचे प्रमाण हे चिंताजनकच राहिले आहे. मागील २४ तासांत १ लाख २० हजार ५२९ नवे रुग्ण आढळले. . तर ३ हजार ३८० जणांचा मृत्यू झाला. १ लाख ९७ हजार ८९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने आज दिली.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने मे महिन्यात कहर केला होता. मागील काही दिवस रुग्णसंख्येत घट होत असल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र रुग्णांच्या मृत्यू होण्याचे प्रमाण कायम राहिले आहे. मागील २४ तासांत ३ हजार ३८० रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे, देशातील ३७७ जिल्ह्यांमधील कोरोना संसर्गाची टक्केवारी ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. यामुळे काही राज्यांनी अनलॉक प्रक्रिया सुरु केली आहे. तर काही राज्यांतील जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याची टक्केवराी ९३ वर पोहचली आहे.
देशभरात आतापर्यंत २ कोटी ८६ लाख ९४ हजार ८७९ जण कोरोनाबाधित झाले तर २ कोटी ६७ लाख ९५ हजार ५४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.आतापर्यंत ३ लाख ४४ हजार ०८२ रुग्णांचा बळी गेला आहे. सध्या १५ लाख ५५ हजार २४८रुग्णांवर उपचार सुरु आहेत, असेही आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.