पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup Semi Final : टी-20 विश्वचषकात भारतीय संघाची दमदार कामगिरी कायम आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. भारतीय संघाने सुपर 8 फेरीमध्ये खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत. सुपर 8 मधील शेवटच्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला. यासह टीम इंडिया ग्रुप 1 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. भारताच्या विजयात रोहित शर्माची भूमिका सर्वात महत्त्वाची राहिली. आता चाहत्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे की टीम इंडिया आपला सेमीफायनल सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळणार आहे.
टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत.
दक्षिण आफ्रिका, भारत, इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.
भारत गट-1 तर द. आफ्रिका गट 2 मध्ये अव्वल स्थानी पोहचले आहेत.
दरम्यान, स्पर्धेच्या सुपर-8 सामन्यात अफगाणिस्तानने डीएलएसनुसार (डकवर्थ लुईस) बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला. या सामन्यातील विजयासह अफगाणिस्तान संघाने टी-20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यासह, टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले असून यात दक्षिण आफ्रिका, भारत, इंग्लंड आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीत कधी, कुठे आणि कोणते संघ आमनेसामने येतील हे जाणून घेऊया. (T20 World Cup Semi Final)
टीम इंडियापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या दोन संघांनी उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. दक्षिण आफ्रिकेचा संघ गट 2 मध्ये अव्वल आहे. तर इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत, गट 1 मधील अव्वल संघाचा सामना गट 2 मधील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होईल. त्यामुळे टीम इंडियाचा उपांत्य सामना इंग्लंडविरुद्ध रंगणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेची लढत अफगाणिस्तानशी होणार आहे. (T20 World Cup Semi Final)
टी-20 विश्वचषक 2024 चा पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात गुरुवारी, 27 जून रोजी ब्रायन लारा स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता खेळवला जाईल. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. प्रत्येक सेमीफायनल सामन्यासाठी 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या दिवशी खेळाच्या शेवटी 60 मिनिटे उपलब्ध असतील, तर राखीव दिवशी अतिरिक्त 190 मिनिटे उपलब्ध असतील.
दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी, 27 जून रोजी गयाना येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना खेळवला जाईल. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही, कारण अंतिम सामन्यासाठी फक्त एक दिवसचा गॅप आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या दिवशी सामना झाला तर दुसऱ्या दिवशी अंतिम सामना होऊ शकत नाही. दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी अतिरिक्त 250 मिनिटे उपलब्ध असतील, कारण या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. जर भारत विरुद्ध इंग्लंड सामना पावसामुळे झाला नाही, तर टीम इंडिया पॉइंट टेबलच्या आधारे अंतिम फेरीत प्रवेश करेल.