नवी दिल्ली : नारळ पाण्याबरोबरच त्याचे खोबरेही आरोग्यासाठी लाभदायक ठरत असते. मात्र ओले खोबरे अधिक गुणकारी की सुके असा प्रश्नही अनेकांना पडत असतो. आता तज्ज्ञांनी याचे उत्तर दिले आहे.
ओल्या नारळाचा स्वाद हलका गोड आणि नटी टेस्टचा असतो. सुके खोबरेही गोड असते पण ते अधिक चावावे लागते. नारळ आतून कोरडा पडला की त्याचे खोबरे करवंटीपासून वेगळे होते. असे खोबरे वाळवून ते साठवून ठेवले जात असते. हे करीत असताना त्याला बुरशी वगैरे लागू नये याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे नुकत्याच फोडलेल्या नारळातील खोबर्याच्या तुलनेत ते खाण्यासाठी थोडे हानीकारकही ठरू शकते. शिवाय कोरड्या नारळात पाणी नसल्याने शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी त्याचा उपयोग नसतो. नारळ सुकला की त्यामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. त्यामध्ये अधिक शुगर, कॅलरी आणि फॅट असते.
ओल्या नारळात अनेक जीवनसत्त्वे व खनिजे असतात. त्यामध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीनही असते. त्यामुळे असे खोबरे खाणे हे उत्कृष्ट ‘प्लँड बेस्ड प्रोटीन डाएट’ ठरते. त्यामध्ये कॅलरी, हेल्दी फॅट आणि ओमेगा 6 फॅटी अॅसिड असते. त्यामध्ये आढळणारे बहुतांश फॅट सॅच्युरेटेड असते. अशा ओल्या खोबर्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते. नारळपाण्याबरोबर मिळणारे खोबरे एक चांगल्या इलेक्ट्रोलाईटचेही काम करते आणि शरीराला हायड्रेटेड ठेवते. सुक्या खोबर्यात फॅट अधिक असतात तसेच ओल्या खोबर्याच्या तुलनेत दुप्पट कॅलरीज असतात. एकंदरीत पोषक मूल्यांचा विचार करता ओले खोबरे अधिक लाभदायक ठरते.