नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधींसह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. सदर बैठकीत राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच आपल्याला लढायची आहे. अशा सुचना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिल्या. तसेच विधानसभा निवडणुकीत कोणते मुद्दे घेऊन जाता येईल यावरही बैठकीत चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीप्रमाणे राज्यात विधानसभा निवडणुकही आपल्याला जिंकायची आहे, असा निर्धार मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी व्यक्त केला.
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात बैठक
महाविकास आघाडीमध्ये समन्वय ठेवूनच निवडणुकीच्या दृष्टीने समोर जावे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजच्या बैठकीत, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले. अशाच पद्धतीचे यश विधानसभेत मिळायला पाहिजे, अशा सूचना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी केल्या. तसेच 'संविधान वाचवा' यासह विविध मुद्दे जे काँग्रेससाठी फायद्याचे राहिले, असे मुद्दे काढण्यात यावेत. जनहिताचे मुद्दे घेऊन लोकांमध्ये जावे. महाविकास आघाडीमध्ये समन्वय ठेवूनच निवडणुकीच्या दृष्टीने समोर जावे,अशा विविध विषयांवर चर्चा झाली.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसची दिल्लीत पहिलीच बैठक होती. लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यांनी काँग्रेसला कौल दिला त्यात महाराष्ट्र एक प्रमुख राज्य आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पार्श्वभूमीवर जास्तीत जागा आपण लढवल्या पाहिजेत, असा सूर काही काँग्रेस नेत्यांचा आहे. महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या जागावाटपाचे सुत्र अद्याप ठरले नसले तरी विविध सूत्र माध्यमांमध्ये समोर येत आहेत.
या बैठकीनंतर बोलताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले की, "महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार बनवेल. सध्या महाराष्ट्र राज्यात भ्रष्ट सरकार आहे. त्यांना खाली खेचण्याचे काम आम्ही करणार आहोत. जातनिहाय जनगणना व्हावी, ही राहुल गांधींची भूमिका आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत एक दिलाने काम केले, त्याचा निकाल आपण पाहिला. विधानसभा निवडणुकीतही आम्ही चांगली कामगिरी करू. मात्र विधानसभेच्या जागा वाटपावर आजच्या बैठकीत कुठलीही चर्चा झाली नाही. तर विधान परिषद निवडणुकीला वेळ आहे. त्यावर स्वतंत्र चर्चा होईल, राज्यात विधानसभेत आणि आगामी विधान परिषदेत किती जागा लढायच्या हेही लवकरच सांगू" असेही ते म्हणाले. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "राज्यात सध्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र राज्यात विकासाच्या नावावर भ्रष्टाचार सुरू आहे. मुंबईत अटल सेतूवर भेगा पडल्या आहेत. राज्यात महायुतीचे सरकार नाही तर महाभ्रष्टाचाराचे सरकार आहे आणि आम्ही त्यांना उघडे पडणार आहोत. देशात जातीनिहाय जनगणनेची भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे. ती आमची सर्वांची मागणी आहे" असेही नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसच्या बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधींसह संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, सरचिटणीस अविनाश पांडे, मुकुल वासनिक, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला, सहप्रभारी आशिष दुवा, सोनल पटेल दत्त हे देखील उपस्थित होते. तर महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, माजी मंत्री नितीन राऊत, यशोमती ठाकूर, सुनील केदार, सतेज पाटील, विश्वजीत कदम, माणिकराव ठाकरे, रजनी पाटील, शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हांडोरे, असलम शेख, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, भाई जगताप, नसीम खान, चरणजीतसिंह सप्रा, नाना गावंडे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.