..तर सर्व संचालक जेलमध्ये असते : आ.प्राजक्त तनपुरे ; बाजार समिती मविआच्या प्रचाराचा प्रारंभ
नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : पणन खात्याचा राज्यमंत्री असताना नगर तालुका बाजार समितीचे सर्व दप्तर मी बाजार समितीत जाऊन तपासले होते. मी सुडाचे राजकारण करणारा असतो तर त्याचवेळी सर्व संचालकांना तुरूंगात टाकले असते, असे प्रतिपादन आमदार प्राजक तनपुरे यांनी केले. महाविकास आघाडीच्या वतीने नगर बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचाराचा प्रारंभ शिवसेना जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आमदार तनपुरे बोलत होते.
आमदार तनपुरे म्हणाले, नगर तालुका बाजार समिती ही जिल्ह्याच्या ठिकाणी असूनही, सत्ताधार्यांच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे तिची अवस्था बिकट बनली आहे. जिरवाजिरवीच्या राजकारणाने अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. बाजार समितीचे संचालक नावालाच आहेत. मलिदा मात्र दुसरीकडेच जातो. बाजार समिती निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊन घरी बसवा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार लंके म्हणाले, राजकारणात पैसा, दहशत चालत नाही. तर नम्रता पाहीजे. ती फक्त महाआघाडी कडेच आहे. कोणाची यंत्रणा कशीही राबवा, पण माझी यंत्रणा रात्रीनंतर सुरू होते. नगर तालुक्यात परिवर्तन होऊन महाआघाडीचाच गुलाल राहणार. शेतकर्यांसाठी शेतकरी निवास तसेच मोफत नाश्ता बाजार समितीमार्फत देण्यात यायला हवा. शशिकांत गाडे सर किंग होऊ शकले नाही, परंतु किंगमेकर नक्की झाले आहेत, असेही लंके म्हणाले.
घनश्याम शेलार म्हणाले, बाजार समितीत शेतकर्यांना सन्मान मिळणे गरजेचे आहे. सत्ताधार्यांकडून दहशत तसेच गैरकारभार करून कर्मचारी, शेतकरी लूट करण्यात येत होती. जिल्हा दूध संघ विकून त्याचे वाटोळे करणारे आता नगर बाजार समितीची जागा विकून त्यात मलिदा खाण्याच्या तयारीत आहेत. मतदारांनी याची जाणिव ठेऊनच मतदान करावे .
यावेळी प्रा.गाडे म्हणाले, नगर बाजार समितीत व्यापार्यांना प्रथम, तर शेतकर्यांना दुय्यम स्थान आहे. बाजार समितीचा कोंडवाडा, कांदा शेडची जागा विकून त्यातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार सत्ताधार्यांनी केला. कर्डिले यांना आता कधीच आमदार होऊ देणार नाही. तालुक्यातील सहकारी संस्थाची वाट लावणार्यांच्या हातात पुन्हा बाजार समितीची सत्ता देऊ नका.
याप्रसंगी रघुनाथ झिने, संपतराव म्हस्के, रावसाहेब शेळके, प्रताप शेळके, भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, किरण काळे, बाबासाहेब गुंजाळ, माधवराव लामखडे, बाळासाहेब हराळ, रोहिदास कर्डिले, संदीप कर्डिले, रघुनाथ झिने, आदी उपस्थित होते.
पिक्चर अभी बाकी है..!
मला ईडीची धमकी देणार्यांनी लक्षात घ्यावे की, माझ्याकडे येऊन ते येडे होऊन गेले. सत्तेचा गैरवापर करणारे अधिकार्यांवर दबाव टाकत आहेत. बाजार समितीत परिवर्तन होणारच आहे. माझी यंत्रणा रात्री कार्यरत होते. तुम्ही पाहत रहा. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है! असे म्हणत लंके यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
प्रशासक काळात उत्पन्नात वाढ
बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती झाली. त्यानंतर समितीच्या उत्पन्नात वाढ झाली असल्याचे बाळासाहेब हराळ यांनी आकडेवारीवरून दाखवून दिले. त्यामुळे सत्ताधार्यांनी पंधरा वर्षांत किती रुपयांचा भ्रष्टाचार केला याची आकडेवारी हराळ यांनी यावेळी दाखविली.
स्वतः:चेच घर फुटले
कर्डिले यांनी तालुक्यात अनेकांचे घर फोडण्याचे काम केले. माझेही फोडण्याचा प्रयत्न केला. पण आज त्यांचेच घर फुटले आहे., त्यांचे पुतणे रोहिदास व संदीप त्यांच्या विरोधात गेले आहेत. शेवटी ही देवाची लिला असते, असा टोला प्रा.गाडे यांनी लगावला.