अकोले : ‘पेयजल’ला ‘पिंपळगाव’चे पाणी देणार : आ. लहामटे यांचे आश्वासन | पुढारी

अकोले : ‘पेयजल’ला ‘पिंपळगाव’चे पाणी देणार : आ. लहामटे यांचे आश्वासन

अकोले : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील मुळा नदीच्या लाभक्षेत्रात दीडशे दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध करून पठारावरील 11 गावे व 23 वाड्यांच्या प्रस्तावित पेयजल योजनानेला पिंपळगाव खांड धरणातून पाणी देणार असल्याचे आश्वासन आ. डॉ. किरण लहामटे यांनी दिले.
पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यासंदर्भात लाभ क्षेत्रातील शेतकरी मेळावा पिंपळगाव धरणाच्या स्थळावर पार पडला. अध्यक्षस्थानी जि. प. चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येेष्ठ नेते सीताराम पाटील गायकर, शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ, काँग्रेसचे नेते मीनानाथ पांडे, अशोकराव देशमुख, भाऊसाहेब रक्टे, कैलासराव शेळके, भानुदास तिंकाडे, महेशराव नवले, शरद चौधरी, मोग्रसच्या सरपंच ज्योती गायकर आदी उपस्थित होते. गेल्या पंधरा दिवसांपासून पिंपळगाव खांड धरणाचे पाणी संगमनेर तालुक्यातील पठारावरील गावांना देण्यावरून पिंपळगाव खांड पाणी बचाव कृती समितीच्या बैठका व जनजागृती अभियान सुरू होत्या. यात आ. लहामटे व सीताराम पाटील गायकर यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली गेली होती.

आ. डॉ. लहामटे म्हणाले की, या ना त्या कारणाने मला आणि गायकरांना बदनाम करण्यासाठी काही बाहुल्या सध्या मुळा विभागात नाचत आहेत. मात्र यांचा सुत्रधार वेगळा आहे, असा टोला त्यांनी लगावला तर पिंपळगाव आडून कुणाला अगस्तीच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुका करायच्या आहेत. हे स्पष्ट दिसते. मात्र मी मुळेच्या शेतकर्‍यांशी गद्दारी करणार नाही. नव्या पाणी साठ्याची प्रशासकीय मान्यता मगच पठाराची योजना हे हरिश्चंद्र राज्याच्या नगरीला मी शब्द देतो.

पण खोटं बोलणार नाही, असे जाहीर केले.पिंपळगाव खांड धरणात नवीन 100 ते 150 एमसीएफटी पाणी आले नंतरच पठारावरील पाणी योजना चालू होईल. सीताराम पाटील गायकर म्हणाले की, मुळेचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सरकारमध्ये अजित पवारांसारखा कर्तबगार माणूस आहे. त्यांच्यामुळेच पिंपळगाव खांड धरण झाले. ज्यांनी धरण दिले. ते पाण्याचा प्रश्न निश्चित सोडवतील. पिण्याचा पाणीप्रश्न निश्चित सोडवला जाईल.

जि. प. च्या उपाध्यक्षांची उडवली खिल्ली

एका नेत्यांला जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष केला. विखे-पाटील नको म्हणत असताना आम्ही ते पद दिले. पण गडी शाळेतल्या मुलांच्या टायला टायलेट म्हणून लागला. तरी विखे-पाटील म्हणाले होते, हा गडी चौथी नापास आहे. त्याना शिक्षण समिती देण्याऐवजी पशुसंवर्धन खाते द्या, असे काँग्रेसचे जेष्ठ नेते मीनानाथ पांडे यांनी नाव न घेता खिल्ली उडवली.

पाणी दिल्याशिवाय राहणार नाही : भांगरे

मर्यादापर्यंत पाण्यासाठी भांडले व लढले पाहिजे. पाणी मिळेपर्यंत पठाराची योजना होऊ देणार नाही. विरोधकांकडे सत्ता नसून सूत्र हलवणारा घरी बसला आहे. कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका. आम्ही तुमच्या बरोबर आहे. आमच्यात धमक असून पाणी दिल्याशिवाय राहणार नाही, असे जि. प. चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button