Supriya Sule News : हे सरकार शेतकरी विरोधी; सुप्रिया सुळेंचा आरोप | पुढारी

Supriya Sule News : हे सरकार शेतकरी विरोधी; सुप्रिया सुळेंचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे विदर्भ दौऱ्यावर होत्या. या दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या संदर्भात त्यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर एका शेतकऱ्याचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे,” हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होते. भाजपने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची आश्वासने देऊन सत्ता मिळवली. पण त्यांच्या शासन काळात कृषीविरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले” (Supriya Sule News)

Supriya Sule News : ग्रामीण अर्थकारण मोडून पडले

सुप्रिया सुळे व्हिडिओमध्ये शेतकरी आणि शेतीविषयक परिस्थिती सांगत असताना भावूक दिसल्या. सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “विदर्भाच्या दौऱ्यावर असताना चारी बाजूंनी अडचणीत अडकलेले शेतकरी भेटले. डोळ्यांत अश्रू आणून भरल्या गळ्याने ते आपल्यावर ओढावलेले प्रसंग सांगतात तेव्हा आपलेही डोळे नकळत पाणावतात. भाजपने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची आश्वासने देऊन सत्ता मिळवली. पण त्यांच्या शासन काळात कृषीविरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. काही ठराविक लोकांचे उत्पन्न अनेकपट वाढले. पण जगाचा पोशिंदा शेतकरी वंचितच राहिला.

त्यांचे उत्पन्न दुप्पट होणे तर दूरच राहिले पण आहे तेदेखील अनेक पटींनी घटले. आहे तेदेखील उत्पन्न टिकवणे शेतकऱ्यांना मुश्कील झाले आहे. त्यांना बी बियाणे, खते आदी चढ्या दराने खरेदी करावी लागतात. एवढा संघर्ष करुन पेरलं तरी बाजारात जाईपर्यंत त्याची शाश्वती नसते. बाजारात आणलं तर सरकारच बाजार पाडतं हे कांदा आणि टोमॅटोच्या बाबतीत उघड झालंय. सोयाबीनची देखील तशीच अवस्था आहे. इतर उत्पादनांचीही तीच स्थिती आहे. शेतकऱ्यांना आज पीकविमा वेळेवर मिळत नाही ना कोणती बँक दारात उभी करते. संपूर्ण ग्रामीण अर्थकारण मोडून पडले आहे. हे सरकार शेतकरीविरोधी आहे हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होते.

हेही वाचा

Back to top button