कोल्हापूर : व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ न देता अंबाबाई मंदिर परिसरातील कामांचे नियोजन करा : राजेश क्षीरसागर | पुढारी

कोल्हापूर : व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ न देता अंबाबाई मंदिर परिसरातील कामांचे नियोजन करा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अंबाबाई मंदिर परिसरातील विकास कामांचे नियोजन करताना शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करावा. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून कामांचे नियोजन करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्या.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि.२) कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, विशेष भूसंपादन अधिकारी शक्ती कदम, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्यासह स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी उपfस्थित होते.

यावेळी क्षीरसागर म्हणाले की, तिरुपती, श्री सिद्धिविनायक, शिर्डी या देवस्थानांच्या धर्तीवर अंबाबाई मंदिर परिसराचा विकास व्हायला पाहिजे. मात्र हा विकास साधताना स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊनच कामांचे नियोजन करावे. सुरुवातीला शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांची तपासणी करुन विकासासाठी ताब्यात घ्याव्यात, उर्वरित कामांसाठी गरज भासली तरच खासगी जागांचा विचार व्हावा, असेही त्यांनी सांगितले. याविषयी व्यापारी, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. आवश्यकतेनुसार राज्यस्तरावर बैठकीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

अंबाबाई मंदिर परिसरात धार्मिक कार्य, भाविकांसाठी पिण्याचे पाणी, अन्नछत्र, निवास व्यवस्था, स्वच्छतागृह, माहिती केंद्र आदी सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button