भाजपला 'वापरा आणि फेका' नीती कसब्यात भोवली : उद्धव ठाकरे
पुढारी ऑनलाईन डेस्क : “भाजपने टिळकांच्या घराण्याचा वापर करून त्यांना बाजूला केलं आहे. तो राग लोकांच्या मनात होता. गिरीष बापटांची तब्येत बरी नसताना त्यांना प्रचारात आणलं. ती सहानुभूती मतदारांनी स्विकारली नाही. भाजप ‘वापरा आणि फेका’ ही नीती सर्वत्र वापरत आहे ती त्यांना भोवली,” अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कसबा मतदारसंघातील मविआच्या विजयानंतर दिली. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, नव्याने झालेल्या बदलाचं स्वागत आहे. कसब्यात पोटनिवडणूक जिंकल्याचा आनंद झाला आहे. एवढ्या वर्षांच्या भ्रमातून कसबा बाहेर पडलं. आता देशही भ्रमातून बाहेर पडायला वेळ लागणार नाही. मतदार वेगळा विचार करू शकतात हे समोर आलं आहे. भाजपच्या विरोधातील मतांची संख्या वाढत आहे. ती एकत्र करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
शिवसेनेबाबतच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने दबावाखाली दिलेला निर्णय मान्य नाही. निवडणूक आयुक्तांबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल महत्वपूर्ण आहे. बेबंदशाहीला वेळीच रोखलं नाही तर हुकूमशाही सोकावेल. सर्वोच्च न्यायालय हे शेवटची आशा असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय राऊतांशी प्रत्यक्ष बोलून प्रतिक्रिया देईन. संजय राऊतांवर हक्कभंग दाखल झाला असेल तर मुख्यमंत्र्यांनी देशद्रोही नेमकं कोण आणि ते कोणाला उद्देशून बोलले? ते कोणासाोबत चहापान करणार होते, हे सांगावे, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :