Ajit Pawar : पालकमंत्री म्हणून फोन केल्याने चुकले कोठे ?
पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : थांबलेल्या कामास गती मिळावी म्हणून अनेक कार्यकर्ते तसेच, नागरिक माझ्याकडे आग्रह धरतात. पालकमंत्री म्हणून ते काम करण्यास मी सांगितले. त्यात राज्य सरकारचा फायदाच होता. मग, माझे काय चुकले? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.20) उपस्थित केला आहे. ते पिंपरी-चिंचवड शहराच्या दौर्यावर होते. गणेश मंडळाच्या सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
पुण्याच्या निवृत्त पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी लिहलेल्या पुुस्तकात अजित पवार यांनी अधिकार्यांच्या माध्यमातून एका बांधकाम व्यावसायिकास येरवडा येथील पोलिस विभागाची जागा देण्यासाठी दबाव टाकल्याचा उल्लेख आहे. त्यावरून राजकीय वादळ उठले आहे. त्यात आपला काही संबंध नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. शुक्रवार (दि. 20) झालेल्या कार्यक्रमात त्यांनी या मुद्द्यावर पुन्हा भाष्य केले.
ते म्हणाले की, एका निवृत्त अधिकार्याने पुस्तक लिहिले आहे. मी खुलासा करेपर्यंत कारण नसताना ‘ध’ चा ‘मा’ करून बातम्या पसरवल्या गेल्या. रखडलेल्या कामास गती मिळावी म्हणून कार्यकर्ते तसेच, नागरिक मला भेटून अधिकार्यांना सूचना करण्याचा आग्रह धरतात. त्यानुसार मी ते काम करण्यास सांगितले. त्यांच्या एका अधिकार्याने तत्कालीन गृहमंत्र्यांनी त्या कामासाठी एक समिती केली आहे.
ती समिती 3 कोटी रुपये किमतीची जागा देणार होती. त्या बदल्यात 15 कोटी रुपयांचे बांधकाम करून मिळणार होते. ते काम सरकारच्या फायद्याचे असल्याने ते काम करा म्हणून त्या अधिकार्यास फोन केला. त्यात काही चुकीचे केले नाही. अल्पसंख्याक, मुस्लिम तसेच, दलित, वंचित असा कोणत्याही घटकास भय वाटेल असे काम महायुतीमध्ये केले जात नाही. तसे, वातावरणही नाही. सर्वांना सोबत घेऊन लोककल्याणाचे काम केले जात आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा
Dhule News : युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण द्यावे : खा. डॉ. सुभाष भामरे
Pimpri news : उद्योगमंत्री आले पण निर्णय न झाल्याने आंदोलन सुरूच
Pimpri News : पालिकेची बिघडलेली घडी पुन्हा बसवायची : अजित पवार