Nashik : तब्बल 39 वर्षानंतर नाशिकमध्ये कांदा परिषद, सदाभाऊ खोत करणार नेतृत्व | पुढारी

Nashik : तब्बल 39 वर्षानंतर नाशिकमध्ये कांदा परिषद, सदाभाऊ खोत करणार नेतृत्व

नाशिक (लासलगाव वार्ताहर) 

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात 1982 नंतर दुस-यांदा कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  शरद जोशी यांनी निफाड तालुक्यातील रुई या गावात 1982 साली पहिली कांदा परिषद आयोजित केली होती. त्यानंतर येत्या ५ जूनला रुईत कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कांदा परिषदेकडे कांदा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

सध्या कांद्याचे दर हे ६ रुपये ते १४ रुपयापर्यंत आहेत. त्यामुळे मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक अडचणीत आहे. त्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

निफाड तालुका हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे केंद्र म्हणून ओळखले जाते. निफाड तालुक्यातील रुई या गावात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सण १९८२ ला याच गावात कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे शरद जोशी यांनी १९८२ साली या गावात पहिली कांदा परिषद घेतली होती. यावेळी देखील शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचावा, कांद्याला अनुदान मिळावे, हमीभाव मिळावा आदी मागण्यासंदर्भात या परिषदेत विचार मंथन करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा त्याच रुई गावात रयत क्रांती संघटनेच्या वतीने येत्या ५ जुन रोजी कांदा परिषद आयोजित करण्यात आली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसापासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. कांद्याला अनुदान मिळावे, हमीभाव मिळावा, नाफेड कडून खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याला दर वाढवून मिळावा या प्रमुख मागण्यासाठी कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कांदा परिषदे प्रसंगी राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार असून यामध्ये रयत क्रांती संघेटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्यासह भाजप नेते प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर देखील उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button