कांदा : टोमॅटो पाठोपाठ कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू | पुढारी

कांदा : टोमॅटो पाठोपाठ कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

लासलगाव; वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या कांदा भावात आता मोठी घसरण झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिक कोंडीत सापडला आहे. २० ऑगस्ट रोजी उन्हाळ कांदा सरासरी १७४० रुपये प्रति क्विंटलने विक्री झाला होता. आठच दिवसांत कांदा दरात २६० प्रति क्विंटलची घसरण झाल्याचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पहायला मिळाले.

यंदा आंध्र प्रदेश, कर्नाटक,गुजरात या राज्यांतून कांद्याचे चांगले उत्पादन होत असल्याने नाशिक जिल्ह्यातील कांद्याची मागणी कमी झाली आहे. तर दुसरीकडे देशातून कांद्याची निर्यात सुरू असली तरी आपल्या तुलनेने पाकिस्तान, अफगाणिस्तानचा कांदा स्वस्त उपलब्ध होत असल्याने याचा फटका भारतीय कांद्याला बसलेला आहे.

यामुळे देशात मुबलक कांदा असल्याने भावात मोठी घसरण सुरू झाली आहे. कांद्यासह टोमॅटो, भाजीपाला अगदी कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.

कांद्याचे आगार असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने मागील वर्षी प्रमाणे चांगला भाव मिळेल या आशेवर कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहे. बदलत्या वातावरणामुळे तो खराब होण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे सध्या मिळणारा दर आणि झालेला खर्च निघत नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आलेला आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या दरात होत असलेली घसरण थांबविण्यासाठी निर्यात प्रोत्साहन योजना राबविणे गरजेचे असल्याचे व्यापारी वर्गाकडून बोलले जात आहे.

काकडी, शिमला पाठोपाठ टोमॅटोलाही भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी अक्षरशः टोमॅटोने भरलेल्या जाळ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात फेकून देत संताप व्यक्त करत आहेत.

हे ही वाचा :

सरासरी कांदा भाव आलेख (प्रति क्विंटल)
२० ऑगस्ट – १७४० रुपये
२३ ऑगस्ट – १६२० रुपये
२५ ऑगस्ट – १५५१ रुपये

 

Back to top button