जावेद अख्तर मानहानी खटला : कंगनाला हायकोर्टाचा दणका, याचिका फेटाळली | पुढारी

जावेद अख्तर मानहानी खटला : कंगनाला हायकोर्टाचा दणका, याचिका फेटाळली

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: ज्येष्ठ लेखक आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या तक्रारीनंतर अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या कारवाई विरोधात अभिनेत्री कंगना रणौत हिने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या निर्णयाने कारवाईचा मार्ग मोकळा झाला असून कंगनाला चांगलाच दणका मिळाला आहे .

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी दिलेल्या तक्रारीवरून दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेल्या फौजदारी कारवाईला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी कऱणारी याचिका कंगानाने केली असून दंडाधिकारी न्यायालयाने नियमबाह्य पद्धतीने ही कारवाई केली असल्याचा आरोप कंगनाने केला आहे.

त्यावर न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्यापुढे या याचिकेवर सुनावणी झाली . यावेळी दंडाधिकारी न्यायालयाने याप्रकरणी केलेली कारवाई ही कायदेशीर प्रक्रियेनुसारच केली आहे. तसेच अब्रुनुकसानीच्या फौजदारी दाव्यात आवश्यक असलेल्या तरतुदींचे योग्यरित्या पालन करण्यात आले असल्याचा दावा अख्तर यांच्यावतीने करण्यात आला होता.

मात्र, निव्वळ पोलिसांनी केलेल्या चौकशीवर ही कारवाई आहे, न्यायालयाने स्वतंत्र चौकशी केलेली नाही, असा बचाव कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केला होता. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने आपला राखून ठेवलेला निर्णय आज जाहीर करताना कंगनाची याचिका फेटाळून लावली .

काय आहे प्रकरण?

सुशांत सिंह राजपूत केसनंतर कंगनाने टीव्हीवर मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने जावेद अख्तर यांच्यासंदर्भात विधान केले होते. तिने जावेद अख्‍तर यांच्यावर अनेक आरोप केले होते. जावेद यांनी कंगना विरोधात नोव्हेंबर, २०२० मानहानीची केस दाखल केली होती.

मॅजिस्ट्रेट यांनी १ मार्च रोजी कंगना विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केला होतं. २५ मार्चला कंगनाला जामीन मिळाला होता.

हेही वाचलं का? 

पाहा व्हिडिओ-कोल्हापूरच्या अवलियाने घरातच साकारले वस्तुसंग्रहालय

Back to top button