CAIT : चीनी कंपन्यांना बसणार 50 हजार कोटी रुपयांचा फटका | पुढारी

CAIT : चीनी कंपन्यांना बसणार 50 हजार कोटी रुपयांचा फटका

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

प्रत्येक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी जनतेने व्यापक मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानुसार सणासुदीच्या काळात चीनी वस्तुंना नागरिक आणि व्यापारी फाटा देत असून, यामुळे येत्या काही काळात चीनी कंपन्यांना सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा फटका बसू शकतो, असा अंदाज कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) वर्तविला आहे.

देशातील उद्योगांना मिळणार फायदा

दिवाळीपूर्व खरेदीमध्ये देशात बनविलेल्या म्हणजेच मेक इन इंडिया आणि घरगुती वस्तुंच्या खरेदीकडे नागरिकांचा कल असल्याचे दिसून येत आहे, असे सीएआयटीचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी एका निवेदनाद्वारे सांगितले आहे. भारतासह विविध शेजारी देशांना वेठीस धरण्‍याचे धोरण चीनने गेल्या काही वर्षापासून अवलंबलेले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी वस्तुंचा वापर न करता देशात बनलेल्या वस्तू वापरुन आत्मनिर्भर भारत मोहिमेत आपल्या परिने योगदान देण्याचे आवाहन केले होते. या मोहिमेचे यश आता दिसून येऊ लागले असल्याचे मानले जात आहे. असंख्य लोकांनी तसेच व्यापार्‍यांनी चीनी वस्तुंवर अघोषित बहिष्कार टाकलेला असल्याने त्याचा थेट फायदा देशातील उद्योग-धंद्यांना होणार आहे, असे खंडेलवाल यांनी नमूद केले.

(CAIT) देशातंर्गत उद्योगांच्या हाती सुमारे दोन लाख कोटी रुपये येण्याचा अंदाज

दिवाळीच्या सणावेळी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. चीनी वस्तुंवरील अघोषित बहिष्कारामुळे देशातंर्गत उद्योगांच्या हाती सुमारे दोन लाख कोटी रुपये येण्याचा अंदाज असल्याचे सांगून खंडेलवाल म्‍हणाले की, चीनकडून सुरु असलेल्या आगळिकीच्या पार्श्वभूमीवर सीएआयटीने गतवर्षी चीनी वस्तुंवर बहिष्कार घालण्याची हाक दिली होती. मात्र यंदा त्यापेक्षा मोठा फटका चीनी वस्तुंना बसणार आहे, कारण लोक स्वतःहून चीनी वस्तुंचा आग्रह सोडत असल्याचे दिसत आहे.

फटाके असोत वा लायटिंगच्या माळा असोत, चीनी वस्तुंकडे लोकांचा कल कमी आहे. दुसरीकडे व्यापारी वर्गही जाणीवपूर्वकपणे चीनी माल टाळत आहेत. चीनी कंपन्यांकडून वस्तुंवर घातक रसायने लावल्या जात असल्याच्या मध्यंतरी बातम्या आल्या होत्या. केवळ दिवाळीच नाही तर चालूवर्षी जवळपास प्रत्येक सणावेळी चीनी वस्तुंची मागणी लक्षणीयरित्या कमी झाल्याचे आम्ही केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. राखी पोर्णिंमा, गणेशोत्सवाच्या काळातही देशात बनलेल्या वस्तुंना लोकांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले होते, असेही खंडेलवाला यांनी सांगितले.

हेही वाचलं का ?

 

 

Back to top button