परभणी : ऐन हंगामात वीज तोडल्याने शेतकऱ्यांमधून संताप | पुढारी

परभणी : ऐन हंगामात वीज तोडल्याने शेतकऱ्यांमधून संताप

रेणाखळी; पुढारी वृत्‍तसेवा : पाथरी तालुक्यातील रेणाखळी, हादगाव शिवारातील शेतकऱ्यांची थकीत बिलांसाठी वीज खंडीत केल्याने शेतकऱ्यांमधून महावितरण विरोधात संताप व्यक्त होत आहे. परतीच्या पावसाने झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्यासाठी शेतकरी नव्याने कामाला लागला आहे. महावितरणने खंडित केलेली वीज पूर्ववत सुरू करावी व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसाच्या खंडाने व परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटलेले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा नव्याने रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. पावसाळा लांबल्‍याने विहिरी, तलाव तुडुंब भरले आहेत. त्‍यामुळे शेतकरी गव्हाच्या पेरणीसाठी शेत तयार करत आहेत. ऊस कारखाने सुरू झाल्याने शेतकरी आपल्या उसाचे वजन वाढीसाठी उसाला पाणी देत आहेत. घटलेले उत्पन्न रब्बी हंगामात भरुन काढण्यासाठी शेतकरी अधिक जोमाने कामाला लागला आहे.

सध्या सोयाबीन, कापूस पिके चांगल्या भावाअभावी घरात पडून आहेत. अशा परिस्थितीत ऐन हंगामात शेतकऱ्यांची वीज खंडित करून महावितरणने शेतकऱ्यांना खिंडीत पकडल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. महावितरणच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या राजकारणात सर्वच पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे भासवत आहेत, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यात कोणालाही स्वारस्य नसल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button