कोल्हापूर : जवाहरच्या नामविस्तारास मंजूरी; कल्लापा आवाडे जवाहर साखर कारखाना असे होणार नामकरण | पुढारी

कोल्हापूर : जवाहरच्या नामविस्तारास मंजूरी; कल्लापा आवाडे जवाहर साखर कारखाना असे होणार नामकरण

हुपरी, पुढारी वृत्तसेवा : कारखान्याच्या ३२ व्या वार्षिक साधारण सभेमध्ये सभासदांनी कारखान्याचा नामविस्तार कल्लापा आवाडे जवाहर साखर कारखाना असे करण्यास सर्वानुमते मंजुरी दिली होती. त्या नुसार केंद्रीय सहकार मंत्रलायाचे केंद्रीय निबंधकांनी कारखान्याच्या पोटनियमात दुरुस्तीस नुकतीच मान्यता दिली. त्यानुसार कारखान्याचा नामविस्तार कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी यळगूड असा झाला आहे.

कारखान्याच्या वाटचालीतील हा अत्यंत आनंदाचा क्षण असून कारखान्याच्या सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद शेतकरी व अधिकारी, कर्मचारी यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यानिमित्त शनिवारी (दि.११) झालेल्या कारखान्याच्या संचालक मंडळ सभेमध्ये याची  नोंद घेण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष  कल्लाप्पा आवाडे  यांचा संचालक मंडळाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

आवाडे यांच्या नेतृत्वाखालील कारखान्याच्या पारदर्शी कामकाजामुळे मागील २९ वर्षात शेतकरी, कामगार, शासन, बँका अथवा अन्य कोणत्याही घटकाची बाकी कारखान्याने ठेवलेली नाही. ही अत्यंत महत्वाची आणि जमेची बाजू आहे. उत्तम आर्थिक व्यवस्थापन उच्च तांत्रिक कार्यक्षमता, ऊस विकास प्रभावी अंमलबजावणी या बाबींची कटाक्षाने आणि जाणिवपूर्वक अमलबजावणी केल्यामुळे देश आणि राज्य पातळीवरील विविध नामांकित संस्थांकडून कारखान्यास अनेक पुरस्कारांनी सम्मानित केले आहेत. दैनंदिन २५०० टन ऊस गाळप करणारा जुना कारखाना ते आधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज असा आज १६००० टन ऊस गाळप आणि २७ मेगा निर्मिती करीत आहे. कारखान्याच्या या यशामागे आवाडे यांनी दिलेला बहुमुल्य वेळ योगदान, श्रम, दादांचे प्रगल्भ विचार, विशाल दूरदृष्टी आणि कृतीशील कार्य या बाबी विशेष उल्लेखनिय आहेत.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ विठी १९९० साली लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. कारखाना उभारणीसाठी त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाचे या नामविस्तारामुळे सार्थक झाले. आहे. तसेच लवकरच देशातील मान्यवर नेत्याच्या प्रमुख उपस्थितीत हा नामविस्तार सोहळा भव्य आणि दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे, अशी भावना कारखान्याचे मार्गदर्शक व आमदार प्रकाश आवाडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

याप्रसंगी आवाडे यानी सर्व सभासद शेतकरी आजी माजी संचालक तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी सर्व अधिकारी कर्मचारी, हितचिंतक यांचे पाठबळ व सहकार्य यामुळे कारखान्याने अल्पावधित उत्तुंग भरारी घेऊन देवकीप्राप्त केला. त्यामुळे कारखान्याच्या या वाटचालीने हे श्रेय माझे एकटा नसून सर्वांचे आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली व सर्वांचे आभार मानले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button