एस. जयशंकर यांनी कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेल्या नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची घेतली भेट | पुढारी

एस. जयशंकर यांनी कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेल्या नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची घेतली भेट

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपावरून मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेल्या नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज भेट घेतली. तसेच, या अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही परराष्ट्र मंत्र्यांनी या भेटीदरम्यान सांगितले.

संबंधित बातम्या – 

भारतीय नौदलाचे आठ माजी अधिकारी ऑगस्ट २०२२ पासून कतारच्या तुरुंगात आहेत. कतारमधील अल दहरा या खासगी कंपनीसाठी काम करत होते. या सर्वांवर कतार प्रशासनाने इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप ठेवून तुरुंगात डांबले होते. कतारच्या न्यायालयाने या आठही जणांना हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर खळबळ उडाली आहे.

या आठ नौदल अधिकाऱ्यांमध्ये कॅप्टन नवतेजसिंह गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कॅप्टन विरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश यांच्यासह राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आलेले निवृत्त कमांडर पूर्णांदू तिवारी यांचाही समावेश आहे. २०१९ मध्ये त्यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

कतार न्यायालयाने या आठ अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारत सरकारने आश्चर्य व्यक्त केले होते. या अधिकाऱ्यांवर नेमके कोणते आरोप आहेत याबाबतचा औपचारिक तपशील कतारतर्फे तसेच भारतातर्फेही जाहीर झालेला नाही. भारत सरकारतर्फे या आठही जणांच्या मुक्ततेसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी आज या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सरकारने या संपूर्ण प्रकरणाची अतिशय गांभीर्याने दखल घेतली असल्याची ग्वाही दिली. या भेटीची माहिती स्वतः परराष्ट्रमंत्र्यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.

परराष्ट्र मंत्र्यांनी त्यात म्हटले की, कतारमध्ये अटकेत असलेल्या आठ भारतीयांच्या कुटुंबीयांची आज सकाळी भेट घेतली. भारत सरकार या विषयाला सर्वाधिक महत्त्व देत असल्याचे या कुटुंबियांना सांगितले. सर्व कुटुंबियांच्या कुटुंबांची चिंता आणि वेदनांची जाणीव असून या अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत राहील, असे आश्वासन कुटुंबीयांना दिले. या प्रकरणात सर्व कुटुंबियांशी समन्वय राखण्यात येईल, असे देखील परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले. दरम्यान, भारतीय नौदलाचे प्रमुख एडमिरल आर. हरीकुमार यांनी देखील स्पष्ट केले की, नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू असून कायदेशीर प्रक्रियेसाठी देखील सरकारतर्फे मदत केली जात आहे.

Back to top button