नागपुरातील अंतिम टक्केवारी जाहीर; जिल्हयात ५४.३० टक्के मतदान | पुढारी

नागपुरातील अंतिम टक्केवारी जाहीर; जिल्हयात ५४.३० टक्के मतदान

नागपूर , पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच मतदार संघांमध्ये शुक्रवारी १९ एप्रिल रोजी मतदान झाले. गडचिरोली सारख्या दुर्गम, नक्षलग्रस्त भागात ७१ टक्के मतदान झाले. त्याचवेळी नागपूर लोकसभा मतदारसंघात ५४ टक्के तर रामटेक लोकसभा मतदारसंघात ६१ टक्के मतदान झाल्याचे पुढे आले. मात्र, अंतिम आकडेवारी जाहीर करण्यास निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर याना दोन दिवस लागल्याने राजकीय पक्षाच्या दृष्टीने हायटेक प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

एकीकडे कोट्यवधी रुपये शासनामार्फत मतदानविषयक जनजागृतीवर खर्च करून ७५ टक्के लक्ष्य असताना मतांचा टक्का वाढू शकला नाही. हे जनतेचे, राजकीय पक्षांचे आणि प्रशासनाचे अपयश आहे. अंतिम आकडेवारी रविवारी (दि.२१) रात्री ५४.३० टक्के असल्याचे जाहीर झाले आहे. रामटेकला मतदान ३ टक्के वाढले असताना नागपुरातील कमी मतांचा टक्का कुणाला धक्का देणार, यावर आता पोल मॅनेजर्स, राजकीय विश्लेषकांची गणिते सुरू आहेत.

नागपुरातील लढत भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे अशी आहे. भाजपला पूर्व विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५६ टक्के मतदानामुळे मताधिक्य देईल, असे बोलले जाते. पश्चिम आणि दक्षिण विधानसभामध्ये सरासरी ५४ टक्के मतदान झाल्याने ५०-५० असे समीकरण आहे. दुसरीकडे ५५ टक्के मतदानाच्या उत्तर आणि मध्य नागपूर विधानसभामध्ये काँग्रेसला हलबा, मुस्लिम, दलित मतांचे विभाजन अशा बदलत्या समीकरणात मताधिक्य मिळेल, अशी आशा आहे. याच भागात मतदानाचा न वाढलेला टक्का गडकरी यांना फायदेशीर ठरू शकतो, असेही बोलले जाते. काँग्रेस, महाविकास आघाडीची यंत्रणा कडक उन्हात मतदान टक्का वाढविण्यात कमी पडली असे दिसते. दुसरीकडे हजारो लोकांची नावे यादीत नव्हती, उत्तरमध्ये मतदान जाणीवपूर्वक स्लो करण्यात आल्याचा ठपका काँग्रेस नेते, पदाधिकारी ठेवत आहेत.

हेही वाचा :

Back to top button