Supriya Sule on Government | लोकसभेत काल्पनिक गोष्टी सत्तेतील सरकार बोलते, आम्ही नाही- खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका
पुढारी ऑनलाईन डेस्क : आम्हाला जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे आम्ही लोकांचे प्रश्नच संसदेत मांडतो. मी असो किंवा खासदार अमोल कोल्हे असोत, आम्ही काल्पनिक गोष्टी लोकसभेत बोलत नाही. तर सत्तेतील सरकार संसदेत काल्पनिक गोष्टी बोलते, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज (दि.२९) तिसरा दिवस आहे. दरम्यान,आज खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील दौड येथे मोर्चात सहभाग नोंदवला. यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या. (Supriya Sule on Government)
करोडो जनतेचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रोश मोर्चाच्या आज तिसऱ्या दिवसाला सुरूवात झाली. संसदरत्न खासदार मा. सुप्रियाताई सुळे व संसदरत्न खासदार मा. श्री. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात आज मोर्चाचा प्रारंभ झाला. यावेळी… pic.twitter.com/Jjtyg9J52q
— NCP (@NCPspeaks) December 29, 2023
देशातील सरकार एक फूल, दोन डाउनफूल; अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
देशातील सरकार केवळ उद्योगपतींचे कर्ज माफ करते, पण येथील कष्टकरी जनतेचे दु:ख त्यांना दिसत नाही. सरकार मुद्यांचे बोलत नाही, त्यामुळे जनतेचे महत्त्वाचे प्रश्न भरकटत आहेत. पालकमंत्री हे मालकमंत्री झालेत, असा आरोप खासदार खासदार अमोल कोल्हे यांनी देशासह राज्यातील सरकारवर केला. दरम्यान, त्यांनी देशातील सरकार “एक फूल, दोन डाउनफूल” अशी मिश्किल टीका करत, सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखालील शेतकरी आक्रोश मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, ते माध्यमांशी बोलत होते. (Supriya Sule on Government)
कांदा निर्यात बंदीवर एकही सत्तेतील नेता बोलत नाही
पुढे बोलताना खासदार कोल्हे म्हणाले, देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवत आहेत. दरम्यान गेले २२ दिवस देशात कांदा निर्यातीवर बंदी आहे. पण सरकारमधील एकही नेता यासाठी दिल्लीतील सरकारला डोळ्यात डोळे घालून प्रश्न करत नाही, निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी करत नाही, असे देखील अमोल कोल्हे म्हणाले. (Amol Kolhe on Government)
रामाचा मक्ता कोण घेतंय, हे जनता पाहतेय
रामाचे नाव मनात ही घेतले तरी चालेल, अन् आयोध्येतही जाऊन घेतले तरी चालेल. रामाचा मक्ता कोण घेतंय, हे देशातील जनता पाहतंय, असेही खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. (Amol Kolhe on Government)