साखर कारखाने 1 ऑक्टोबरला सुरू करा : ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांची मागणी | पुढारी

साखर कारखाने 1 ऑक्टोबरला सुरू करा : ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांची मागणी

शिवनगर : पुढारी वृत्तसेवा :  निरा खोर्‍यातील साखर कारखानदारी 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी माळेगाव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी केली आहे. हे दोघेही दै. ‘पुढारी’शी बोलत होते.
निरा खोर्‍यातील धरणक्षेत्रात पडलेल्या कमी पावसाने नद्यांचे पाणी आटले आहे. परिणामी, दुष्काळी स्थिती असून, कालव्याच्या पाण्याच्या आवर्तनाचा प्रश्नदेखील आहे. विहिरी, कूपनलिका आदींची पाणीपातळी घटली असून, याचा ऊस पिकावर परिणाम होईल. या परिस्थितीचा विचार शासनाने करावा, असे तावरे यांनी सांगितले.

तावरे म्हणाले की, निरा खोर्‍यात हजारो एकर ऊसक्षेत्र आहे. या खोर्‍यातील धरणक्षेत्रात पाऊस कमी पडल्याने दिवसेंदिवस धरणातील पाण्याचा साठा कमी होत आहे, तर नद्यांचे पाणी वाहताना दिसत नाही. घटलेल्या पर्जन्यमानामुळे आटलेल्या विहिरी आणि कूपनलिका पाहता ऊसशेती जगवायची कशी? असा गहण प्रश्न ऊस उत्पादक शेतकर्‍यांपुढे निर्माण झाला आहे. पाऊस पडेल, या आशेवर आडसाली लागण हंगामात केलेल्या ऊस लागणी आणि उभा असलेला ऊस, याबाबत पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी प्रचंड चिंतेत आहे.
शासनाच्या धोरणानुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये साखर कारखानदारीचा गाळप हंगाम सुरू होतो.

मात्र, प्राप्त परिस्थितीचा विचार करता धरणक्षेत्रातील घटलेली पाणीपातळी आणि त्यामुळे उशिरा मिळणारे पाण्याचे आवर्तन भविष्यात मिळेल, याबाबत ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या मनात शंका आहे. त्यामुळे आडसाली लागणीचे ऊस आणि उभे ऊस टिकवायचे असतील, तर गाळप हंगाम शासनाने 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी द्यावी, असे मत तावरे यांनी व्यक्त केले. ऑक्टोबरमध्ये कारखानदारी सुरू केली, तरी कमी मिळणारी साखरेची रिकव्हरी आणि काही प्रमाणात घटणारे टनेज, यामुळे ऊस उत्पादकांना थोडे नुकसान सोसावे लागेल.

परंतु, जर उशिरा साखर कारखानदारी सुरू केली, तर मात्र मोठ्या प्रमाणावर उसाचे उत्पादन घटणार आहे. वाळलेला आणि वाढे नसलेला ऊस तोडण्यास तोडणी कामगारदेखील नकार देण्याची शक्यता आहे. अशावेळी ऊस उत्पादक शेतकर्‍यांवर दुहेरी संकट येईल. डोळ्यांदेखत जळून चाललेली ऊसशेती पाहताना कदाचित ऊस उत्पादकांच्या मनात आत्महत्येचा विचारदेखील येऊ शकतो. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता शासन धोरणानुसार प्रथम पिण्याच्या पाण्यास प्राधान्य, नंतर उद्योग व नंतर शेती, अशी क्रमवारी असते. अशावेळी जर साखर कारखानदारी लवकर सुरू केली, तर पुढील काळात पाण्याचे आवर्तनदेखील वाचून उपलब्ध पाण्याचा योग्य विनिमय करता येईल, असे मत तावरे यांनी व्यक्त केले.

सन 2003-04 ची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता
गाळप हंगाम सन 2003-04 हा साखर कारखानदारीसाठी अत्यंत वाईट हंगाम होऊन गेला. त्या वेळी भीषण दुष्काळामुळे उसाची मोठ्या प्रमाणावर कमतरता निर्माण झाली होती, तर साखर कारखाने सुरू करावेत का बंद ठेवावेत? असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सद्य परिस्थितीत येऊ घातलेला दुष्काळ पाहता गाळप हंगाम सन 2003-04 ची परिस्थिती भविष्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Back to top button