नारायणपूर : सासवडला राष्ट्रवादीच्या वतीने ‘अग्निपथ’चा निषेध | पुढारी

नारायणपूर : सासवडला राष्ट्रवादीच्या वतीने ‘अग्निपथ’चा निषेध

नारायणपूर : मोदी सरकारने आणलेल्या सर्व मोठ्या योजना सपशेल अपयशी ठरल्या आहेत. सीएए, कृषी कायदे आणि आता अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभर हिंसक आंदोलन होत आहे. शेतकर्‍यांचे आंदोलन वर्षभर चालले. यामध्ये 700 हून अधिक शेतकरी मृत्युमुखी पडले. यासंदर्भात पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सासवड येथील तहसीलदार कचेरीसमोर आंदोलन करण्यात आले.
अग्निपथ योजना केंद्र सरकारने सशस्त्र दलांच्या कमिशन अधिकार्‍यांच्या खाली काम करणार्‍या सैनिकांच्या भरतीसाठी सुरू केलेली आहे.

या तरुणांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना 3.5 वर्ष सैन्यात सेवा करून निवृत्त करण्यात येईल व अग्निपथ योजनेसाठी वयाची अट 17.5 वर्षे ते 23 वर्षे असून वयाच्या या टप्प्यात त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करत असतो. म्हणजे युवक राष्ट्रसेवा करू इच्छितात त्यांना वयाच्या मोलाची ही 4 वर्षे राष्ट्रसेवेत घालवल्यानंतर मोदी सरकार त्यास निवृत्ती देणार. निवृत्ती झाल्यानंतर त्या युवकांना पुढील आयुष्यात चांगला रोजगार मिळवणे खूप कठीण आहे.

या देशातील युवा पिढीच्या भवितव्याशी केलेली ही एक चेष्टा आहे, असे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणाले या वेळी माजी आमदार अशोक टेकवडे, प्रवक्ते विजय कोलते, सुदाम इंगळे, हेमंत माहुरकर, पुष्कर जाधव, बापू भोर, योगेश फडतरे, ईश्वर बागमार, रामभाऊ काळे, पुरंदर तालुका महिला अध्यक्षा गौरी कुंजीर, सासवड शहर महिला अध्यक्षा नीता सुभागडे, बाळासाहेब कामथे, अतुल जगताप, संदेश पवार, तेजपाल सणस, सतीश शिंदे आदी उपस्थित होते.

Back to top button