नाशिक जिल्ह्यातील किकवीसह इतर प्रकल्प मार्गी लागणार, जलसंपदामंत्र्यांची माहिती | पुढारी

नाशिक जिल्ह्यातील किकवीसह इतर प्रकल्प मार्गी लागणार, जलसंपदामंत्र्यांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प असलेल्या किकवी पेयजल प्रकल्प आणि पार गोदावरी उपसा जोड योजना लवकर मंजूर होण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेऊन या कामांना तत्काळ मार्गी लावणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अन्न, नागरी पुरवठामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिली.

कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी, आंबोली वेळुंजे या प्रवाही योजना तसेच नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागांंतर्गत असलेल्या विविध प्रकल्प मंजुरीची बैठक मंत्रालयात पार पडली. बैठकीस ना. छगन भुजबळ, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, लाभक्षेत्र विकास सचिव किरण कुलकर्णी, सहसचिव अतुल कपोते, नगरचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता संगीता जगताप उपस्थित होते.
जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प प्रस्ताव तसेच कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी, आंबोली, वेळुंजे या प्रवाही योजना, किकवी पेयजल प्रकल्प व पार गोदावरी उपसा जोड योजनांच्या कामांच्या बाबतीत राज्य तांत्रिक सल्लागार समिती, नियोजन विभाग अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यातील त्रुटी दूर करून कामे मंजूर करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून उच्चस्तरीय बैठक घेऊन कामे मार्गी लावण्यात येईल.

पालकमंत्री भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यास जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पांंतर्गत दिंडोरी तालुक्यातील धोंडाळपाडा, ननाशी, मांजरपाडा (देवसाने), गोळशी महाजे यासह इतर प्रवाही वळण योजना तसेच पुणेगाव दरसवाडी आणि दरसवाडी-डोंगरगाव कालवा विस्तारीकरण आणि ओझरखेड डावा कालव्याची अपूर्ण कामे मार्गी लागतील. कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी या प्रवाही योजनांना प्रशासकीय मान्यता, तर नाशिक शहराच्या भविष्यातील पाण्यासाठी किकवी पेयजल प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक आहे.

.. तर एकात्मिक जलनियोजन शक्य
पार गोदावरी उपसा जोड योजनेमुळे पूर्वेकडे वाहून जाणारे पाणी पश्चिमेकडे गोदावरी खोर्‍यात आणले जाणार आहे. या योजनेत धरणे एकमेकांशी नैसर्गिक उताराने बोगदा व बंद नलिकांद्वारे जोडून मध्यवर्ती धरणाच्या पाणीसाठ्यातून पाण्याचा उपसा करण्याचे नियोजन आहे. सर्व धरणे एकमेकांस समान संचय पातळीत जोडण्यात येणार असल्यामुळे या सर्व साठ्यांचे एकात्मिक जलनियोजन शक्य होणार आहे. गोदावरी खोर्‍यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी पार गोदावरी उपसा जोड योजना क्रमांक 3 व 4 मंजूर करावे, अशी मागणी जलसंपदामंत्री यांच्याकडे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

हेही वाचा :

Back to top button