जळगाव : गोडाऊनला आग लागल्याने लाखोंची सामग्री जळून खाक | पुढारी

जळगाव : गोडाऊनला आग लागल्याने लाखोंची सामग्री जळून खाक

जळगाव पुढारी वृत्तसेवा : रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या गोडाऊनला रात्री उशीरा लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे लग्नाचे साहित्य जळून खाक झाले आहे. आग विझविण्यासाठी चार अग्निशमन दलाचे बंब गावात आले होते.

रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या गोडाऊन मध्ये पाडळे येथील एका व्यक्तीने मंडप व इतर साहित्य ठेवले होते. रात्री अचानक एकच्या सुमारास मोठी आग लागली. काही क्षणातच आगीचे लोळ उठल्याचे दिसून आले. दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच संदीप सावळे यांनी गावकर्‍यांना उठवून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आग जास्त असल्याने अखेर त्यांनी रावेर नगर पालिका व पोलिस स्टेशनला आग लागली असल्याची माहिती दिली. अग्निशामक दलाची गाडी अहीरवाडी येथे दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला तरी आग आटोक्यात येत नव्हती. सावदा येथून देखील अग्नीशामक दलाची गाडी येथे आली आणि सुमारे दोन तासानंतर आग आटोक्यात आली.

आग विझवण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नागेश्वर चौधरी तसेच बाळू महाजन, बंडू पाटील, विशाल चौधरी, सुशांत चौधरी, मनोज महाजन, अश्विन पाटील, किरण लासुरे, अशोक चौधरी, भगवान पाटील, कन्हैया चौधरी, मोहन महाजन, प्रशांत सावळे, शुभम वैद्य, डिगंबर राजपूत, गोकुळ चौधरी, जितू सावळे, विकास सावळे, रामभाऊ सावळे, मयुर सावळे, गणेश धनगर, नागेश्वर चौधरी, भागेश्वर चौधरी, सुनील महाजन, कन्हैया महाजन यांच्यासह इतरांनी मदत केली.

दरम्यान, या आगीत सुमारे २५ लाख रूपयांची सामग्री जळून खाक झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची तक्रार कोणीही पोलीस स्थानकात दिलेली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सकाळी विचारले असता सांगितले आहे.

हेही वाचा :

Back to top button