नाशिक शहरात उद्यापासून 29 जूनपर्यंत मनाई आदेश, 'हे' आहे कारण
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सत्ताधारी व विरोधकांचे होणारे आरोप-प्रत्यारोप, महिनाअखेरीस साजरी होणारी आषाढी एकादशी आणि बकरी ईद या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. १४ ते २९ जूनपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.
आदेशानुसार नागरिकांना शहरात दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, दगड, शस्त्रे, अस्त्रे, गावठी कट्टा, तलवार, दांडे, काठ्या आणि अन्य प्राणघातक हत्यारे आणि वस्तू बाळगता येणार नाहीत. कोणत्याही फोटोंचे, प्रतीकात्मक पुतळ्यांचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करता येणार नाही. अर्वाच्च घोषणा, आवेशपूर्ण भाषण करता येणार नाही. वाद्ये वाजविणे, महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावणे, पेढे वाटणे, फटाके वाजविणे, घंटानाद करणे, धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करणे आदी बाबींनाही मज्जाव करण्यात आला आहे. जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, अंत्ययात्रा, सिनेमागृहांसाठी लागू राहणार नाहीत. पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा किंवा मिरवणूक काढण्यासही या काळात सक्त मनाई राहणार आहे.
हेही वाचा :