रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उद्धव ठाकरेंनी सुचवलं होतं, अन् आता विरोध करताय : उदय सामंत | पुढारी

रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उद्धव ठाकरेंनी सुचवलं होतं, अन् आता विरोध करताय : उदय सामंत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

एखादा प्रोजेक्ट कोकणात येत असेल, कोकणाचा कायापालट होत असेल तर तेथील आंदोलन करत्या शेतकऱ्यांचा गैरसमज दूर करण्याची सर्व पक्षांची जबाबदारी आहे. मात्र त्यावरुन राजकारण केलं जात आहे. रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाणी उद्धव ठाकरे यांनीच सूचवले होते. तसे पत्र त्यांनी पंतप्रधान मोदींना लिहले होते. एकीकडे पत्र द्यायचे आणि आता विरोध करायचा हा दुटप्पीपणा असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

उदय सामंत नाशिक दौऱ्यावर आहेत.  बारसू रिफानरीच्या सर्वेक्षणाविरोधात तेथील काही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्याविषयी पत्रकारांशी आज नाशिकमध्ये उदय सामंत यांनी संवाद साधला. यावेळी, 12 जानेवारी 2022 रोजी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहलेल्या पत्राचा दाखला देत बारसू हे ठिकाण रिफायनरीसाठी उद्धव ठाकरे यांनीच सुचवल्याचे सामंत म्हणाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यानं ठाकरेंचा बारसू प्रकल्पाला विरोध आहे. आज उद्धव ठाकरे सीएम असते तर असा विरोध केला नसता अशी टीका उदय सामंत यांनी यावेळी केली.

सामंत म्हणाले, या प्रकल्पातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. मात्र, केवळ सरकार बदल्याने आता प्रकल्पाला विरोध होतोय.  काही लोकांचे मनसुबे धुळीस मिळाल्याने जालियनवाला बाग होईल असे बोलले जात आहे. विनाकारण  गैरसमज पसरवले जात असल्याची टीका सामंत यांनी यावेळी केली.

एकीकडे काही उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले म्हणून विरोध झाला. मग आता उद्योग येत असताना उद्योगाला विरोध का करताय? हा दुटप्पीपणा असल्याचे सामंत म्हणाले. तेथील स्थानिकांचे काही गैरसमज आहे ते दूर केले पाहीजे. बारसूमध्ये सध्या कुणीही आंदोलन करत नाही, जे कुणी करत असतील त्या शेतकऱ्यांचे गैरसमज दूर केले जातील. शेतक-यांवर दडपशाही आणली जाणार नाही. दुटप्पी राजकारण थांबवत सर्वपक्षीयांनी एकत्र यावं असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा : 

Back to top button