डाॅ. आंबेडकरांनी ‘The Problem of Rupee’मधून  एक मार्गदर्शक तत्व जगासमोर ठेवलं : शरद पवार  | पुढारी

डाॅ. आंबेडकरांनी 'The Problem of Rupee'मधून  एक मार्गदर्शक तत्व जगासमोर ठेवलं : शरद पवार 

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे समष्टी फाउंडेशन, आंबेडकर लॅब इनिशिएटिव्ह आणि NICE द्वारे आयोजित “THE PROBLEM OF RUPEE ITS ORIGIN AND ITS SOLUTION”हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि अर्थक्षेत्रातील देश विदेशातील अभ्यासक उपस्थित होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहिलेला The Problem of Rupee हा ग्रंथ आजही प्रासंगिक ठरतो. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. वाचा त्यांच्याच शब्दात. (Sharad Pawar)

  डाॅ. आंबेडकरांच्‍या अर्थ विचारांची  जगभरातील अर्थशास्त्रज्ञांनी घेतली…

यावेळी शरद पवार म्‍हणाले, “डॉ. बाबासाहेबांनी अनेक विषयांवर लिखाण केलं. विशेषतः अर्थशास्त्राचा आधार घेऊन त्यांनी जे लिखाण केलं त्याची नोंद ही देशातच नव्हे तर देशाबाहेर सुद्धा जाणकारांनी घेतली होती. आयुष्यातील काही महत्वाचा काळ त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये घालवला. नंतरच्या काळामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. १९२३ च्या आसपास परत आल्यानंतर मुंबईच्या कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून त्यांनी योगदान दिलं होतं. त्यामधून विशेषतः त्यांनी जे लिखाण केलं, त्या लिखाणामध्ये “The Problem of Rupee” असा अत्यंत महत्त्‍वाचा अर्थशास्त्र संबंधी कठाेर भूमिका मांडणारा ग्रंथ त्यांनी लिहिला.  त्याची नोंद जगातल्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी केली. काहींनी त्याला मान्यता दिली नाही तरीसुद्धा त्यामधील त्यांचं लिखाण त्यांनी मनापासून स्वीकारलं.

स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये जे एक सरकार झालं, त्या सरकारमध्ये “Water Resources & Power” या मिनिस्ट्रीची जबाबदारी बाबासाहेबांवर आली. त्यावेळेला या देशात उपलब्ध असलेल्या पाण्याचा उपयोग कसा करायचा ? त्यासंबंधीची उभारणी कशी करायची ? याबद्दल अत्यंत मोलाचे निर्णय हे त्यांनी घेतले. उदाहरण सांगायचं झालं तर, आज पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये अन्नधान्याच्या बाबतीमध्ये जी एक स्वयंपूर्णता प्राप्त झाली, त्यामागील मूलभूत कारण भाकरा आणि नांगल धरणांचा निर्णय त्या काळामध्ये बाबासाहेबांनी घेतला होता. “Damodar Valley Corporation” या अत्यंत महत्वाच्या पाटबंधारे प्रकल्पाचा निर्णयसुद्धा स्वातंत्र्याआधी त्यावेळच्या सरकारमध्ये असताना बाबासाहेबांनी घेतलेला होता. एका दृष्टीने पाण्यासंबंधी व पाटबंधारे संबंधी मूलभूत निर्णय त्यांनी घेतले. हे घेत असताना पाण्यापासून व प्रकल्पापासून विद्युत निर्मिती ही सुद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे आणि ते करणं सहज शक्य आहे हा विचार त्याकाळी बाबासाहेबांनी मांडला. आज विद्युत क्षेत्रामध्ये प्रचंड बदल झालेले आहेत. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आज महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड असेल किंवा अन्य संस्था या राज्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये काम करतात अनेक राज्यांमध्ये त्या संस्था काम करतात. पण ह्या राज्यामध्ये हे काम करत असताना ती विद्युत निर्मिती एखाद्या राज्याला पुरेल त्यापेक्षा सुद्धा अधिक असेल आणि काही राज्य अशी आहेत की, ज्या ठिकाणी विद्युत निर्मितीला मर्यादा आहेत. अशा ठिकाणी विद्युत उपलब्ध करून देण्यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे हा विचार बाबासाहेबांनी त्या काळामध्ये केला.स्वातंत्र्याआधी स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ही संकल्पना बाबासाहेबांनी मांडली. एवढेच नव्हे तर अधिक अतिरिक्त वीज ज्या ठिकाणी आहे आणि ज्या राज्यामध्ये वीज नाही त्या ठिकाणी वीज पोहचवण्यासाठी अनेक निर्णय बाबासाहेबांनी घेतले.

बाबासाहेब म्हटल्यानंतर आपल्या सर्वांसमोर प्रकर्षाने एकच विषय जातो तो म्हणजे संविधान. संविधानाबद्दल त्यांचं योगदान यासंबंधी चर्चा करण्याचं कारण नाही. कारण आज या देशामध्ये खऱ्या अर्थाने संसदीय लोकशाही जी टिकली त्यामध्ये संविधानामधील त्यांच्या योगदानालाच श्रेय द्यावं लागेल, यामध्ये काहीच शंका नाही. संविधानासंबंधी मोलाचं काम जसं त्यांनी केलं तसंच विद्युत, जलसंधारण, कामगार क्षेत्रातले कायदे आणि अन्य कायदे यासंबंधीसुद्धा जो मूलभूत विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला त्याचा फायदा स्वातंत्र्यानंतर सुद्धा या देशातल्या कोट्यावधी नागरिकांना अनेक वर्षांपासून मिळत आहे. हेच त्यांचं जे योगदान आहे त्याचं स्मरण करणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.

अर्थशास्त्र संबंधित त्यांनी जे लिखाण केलं, “The Problem of Rupee” या ग्रंथाच्या माध्यमातून सोनं आणि चलन किंवा चांदी आणि चलन यांचे असलेले संबंध याबद्दल एक मार्गदर्शक तत्व बाबासाहेबांनी जगासमोर ठेवलं. मला आनंद आहे की, आज चव्हाण सेंटर मध्ये “The Problem of Rupee” संदर्भात अर्थपूर्ण चर्चा झाली. आमच्या सर्व तरुण सहकाऱ्यांनी याबद्दलचा लहानसा सोहळा या ठिकाणी आयोजित केला या सगळ्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो.

 

हेही वाचा 

Back to top button