जुनी पेन्शन प्रश्न : रेल्वे चक्का जाम, भारत बंदचा इशारा | पुढारी

जुनी पेन्शन प्रश्न : रेल्वे चक्का जाम, भारत बंदचा इशारा

अहमदनगर; पुढारी वृत्त्तसेवा : जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, रेल्वे युनियन, केंद्रीय कर्मचारी संघटनेसह इतर कर्मचारी संघटनांनी रामलिला मैदानावर एकत्र येत भव्य पेंशन मागणी आंदोलन केले. सरकारने पेन्शन लागू करण्याची मागणी मान्य न केल्यास भारत बंदसह बेमुदत संप पुकारण्याचा ईशारा केंद्र सरकारला आंदोलकांनी दिला असल्याची माहिती राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे यांनी दिली.

राष्ट्रीय पेन्शन आंदोलनाचे निमंत्रक शिव गोपाल मिश्रा,सहसंयोजक डॉ एम राघवैय्या, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे महासचिव कमलाकांत त्रिपाठी, वरिष्ठ उपाध्यक्ष रामचंद्र दबास, देविदास बस्वदे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलकांच्या उपस्थितीने रामलीला मैदान पूर्णपणे खचाखच भरले होते.

जुनी पेन्शन पूर्ववत न केल्यास रेल्वे चक्का जाम व भारत बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल आणि त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा रेल्वे कर्मचारी युनियनने केंद्र सरकारला दिला. यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे महासचिव कमलाकांत त्रिपाठी म्हणाले की, पेन्शन हा कर्मचार्‍यांचा हक्क असून आम्ही तो मिळवणारच पेन्शन ची मागणी पूर्ण करण्यासाठी गरज पडल्यास संपावर जाण्याचा इशारा दिला.सरकारने कर्मचार्‍यांच्या भावना लक्षात घ्यावी असेही ते यावेळी म्हणाले.

नो पेन्शन नो वोट, जो पेन्शन की बात करेंगा वही देशपर राज करेंगा, यासारख्या घोषणांनी आंदोलकांनी रामलीला मैदान दणाणून सोडले होते. या आंदोलनासाठी प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष देविदास बस्वदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, विदर्भ विभागप्रमुख किरण पाटील,जिल्हा सचिव सुनील शिंदे, नारायण पेरके, संजय मानकरी आदी नगर जिल्ह्यातील कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा

कमावता नाही, तरीही सक्षम पती म्हणून पत्नीला पोटगी द्यावी लागेल, मुंबई कोर्टाचा निर्णय

राष्ट्रवादीत फूट की एकसंध लवकरच कळेल : गिरीश महाजन

हिंसाचारग्रस्त मणिपुरात २५ वर्षांनंतर हिंदी चित्रपट!

Back to top button