पुणे : बाहेरून मुलगी आणताय? काळजी घ्या…! | पुढारी

पुणे : बाहेरून मुलगी आणताय? काळजी घ्या...!

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : लग्न करायचंय… मुलगी पाहिजे… आम्ही देतो सोयरिक जुळवून… कमिशन द्यावं लागेल…. मग काय… सगळं कसं ओकेमधी… असे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. मात्र, त्यात फसवणूक करणार्‍या टोळ्या कार्यरत असल्याचे प्रकार घडले आहेत. ग्रामीण भागातील अनेक मुलांना लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने विदर्भ, मराठवाडा किंवा परराज्यांतून मुलगी शोधून लग्न केले जात असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. वर आणि वधू दोन्हीही पक्षाच्या मध्यस्थीकडून कमिशन घेऊन सोयरिक जमविली जाते. परंतु, आता अशा प्रकारे लग्न करून फसवणूक करणार्‍या टोळ्या कार्यरत झाल्याचे निदर्शनास येत आहे.

लग्न जमवताना आमची परिस्थिती गरिबीची असल्याने आम्हास खर्च परवडणारा नाही, त्यामुळे सर्व खर्च वर पक्षास करावा लागेल. आम्हास रोख रक्कम द्यावी लागेल, असे मुलीच्या घरच्यांकडून सांगण्यात येते. मुलीला साड्या, दागिने, मोबाईल तसेच मध्यस्थींचे कमिशन या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लग्नसोहळा पार पडतो. मुलीकडच्यांना रोख रक्कम, त्याचबरोबर मुलीचा, मध्यस्थींचा आणि लग्नाचा असा सर्व खर्च करून झाल्यानंतर मुलगी माहेरी जाते आणि परत येतच नाही. तेव्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न होतो आणि आपली फसवणूक झाल्याचे वर पक्षाच्या लक्षात येते.

मुलीकडून मी येणार नाही आणि शिवाय तुमच्याविरोधात माझी फसवणूक करून लग्न केले, अशी पोलिसांत तक्रार करेल, अशी धमकी दिली जाते. अगोदरच खूप खर्च झालेला असतो आणि आता इज्जत जाईल म्हणून मुलाकडचे तक्रार न करता तसेच शांत बसतात. एकदा तर लग्नानंतर माहेरी गेलेल्या मुलीला आणण्यासाठी मुलगा आणि त्याचे सहकारी गेले तेव्हा ज्या मुलीशी विवाह झाला होता ती मुलगी तिच्या लहान मुलांसोबत पाहून त्यांना धक्काच बसला. शिवाय जीव प्यारा असेल तर आल्या पावली परत फिरा; अन्यथा जीव गमावून बसाल, अशी धमकी मिळाल्याने त्यांची पळता भुई थोडी झाल्याचीही घटना शिरूर तालुक्यात घडली आहे. त्यामुळे विवाह जमविताना पालकांनी आणि मुलांनी विशेष काळजी घेऊन सर्वतोपरी खात्री झाल्यानंतरच विवाह केला पाहिजे; अन्यथा अशा प्रकारे फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते.

Back to top button