Maharashtra Governor : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून राज्यपाल उघड माथ्याने कसे फिरताहेत ? – संभाजीराजे छत्रपती | पुढारी

Maharashtra Governor : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून राज्यपाल उघड माथ्याने कसे फिरताहेत ? - संभाजीराजे छत्रपती

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक! मात्र, देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना (Maharashtra Governor) सुरक्षा! हा कोणता न्याय? असं ट्विट करत माजी खासदार संभाजीराजे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. ट्विटमध्ये त्यांनी “स्वराज्य” संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांचा व्हिडिओही शेअर केला आहे.

Maharashtra Governor : आमच्या दैवतांचा, महापुरुषांचा अवमान करणारे….

छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांच्या बाबत राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पुण्यात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना काळे झेंडे दाखवत, ‘राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत राज्यपालांचा निषेध करण्यात आला. यावेळी यावेळी पोलिसांनी धनंजय जाधव यांच्यासह स्वराज्याच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. खासदार संभाजीराजे यांनी पोलिसांनी स्वराज्याच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतानाचा व्हिडिओ ट्विट करत राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, “राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक ! आणि देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा ! हा कोणता न्याय ?” “स्वराज्य”चे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथे भगतसिंग कोश्यारीला काळे झेंडे दाखवले. म्हणून स्वराज्यच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, मग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून उघड माथ्याने कसे फिरत आहेत? आमच्या दैवतांचा, महापुरुषांचा अवमान करून कोश्यारी उघड माथ्याने राज्यात फिरतात, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट त्यांच्या वक्तव्याचा संवैधानिक मार्गाने निषेध केला तरी पोलिस कारवाई करतात. हा कुठला न्याय आहे ?

Maharashtra Governor : काय आहे नेमकं प्रकरण

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी  एका कार्यक्रमात भाषण देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते की, “आम्ही जेव्हा शिकत होतो. हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होतो, तेव्हा शिक्षक आम्हाला विचारायचे की, तुमचा आवडता हिरो कोण? तुमचा आवडता नेता कोण? तेव्हा आमच्यापैकी काहींना सुभाषचंद्र बोस, कोणाला नेहरू तर कोणाला महात्मा गांधी आवडत होते. मला असे वाटते की, जर कोणी तुम्हाला विचारत असेल की, तुमचा आवडता हिरो कोण आहे? तर त्याला बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्हाला हे हिरो महाराष्ट्रातचं मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी सध्याच्या घडीबाबत बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला इथेच तुमचे हिरो मिळतील. राज्यपालांच्या या वक्तव्यावर विविध स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या भाषणाचा  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. महाराष्ट्रभर या विधानावरुन संतापाची लाट पसरली.

हेही वाचा 

Back to top button