Sanjay Raut : शिंदे गटात अंतर्गत ठिणग्या उडताहेत; स्फोटानंतर वस्तूस्थिती समोर येईल : संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut : शिंदे गटात अंतर्गत ठिणग्या उडताहेत; स्फोटानंतर वस्तूस्थिती समोर येईल : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिंदे गटातील आमदार, खासदारांमध्ये काय सुरू आहे, त्याबद्दलची खबरबात माझ्याकडे आहे. त्यांच्यामध्ये अंतर्गत ठिणग्या उडत आहेत. याचा स्फोट होईल, तेव्हा वस्तूस्थिती समोर येईल. तिकडे गेलेल्या आमदार खासदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे, त्यांचे भविष्य चांगले दिसत नाही, असे थेट आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (दि.२) पत्रकार परिषदेत दिले.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, शिवसेनेतून ४० नेते गेले, तरी पक्ष आहे तेथेच आहेत. पालापाचोळा उडून गेला आहे. त्यामुळे काही फरक पडत नाही. एखादा आमदार, खासदार सोडून गेल्याने काहीही होणार नाही. कधीही निवडणुका घ्या, विजय शिवसेना ठाकरे गटाचा होईल. मशाल, धनुष्यबाण कुठल्याही चिन्हावर निवडणूक लढविण्याची आमची तयारी आहे. आगामी सर्व निवडणुकीत शिवसेना हाच चेहरा असेल. हजारो शिवसैनिक हीच ठाकरे गटाची ताकद आहे. संपूर्ण महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे. शिंदे गटात गेलेल्या सर्व आमदार आणि खासदारांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. जे सोडून गेले आहेत. त्यांनी स्वत:ची कबर खोदून ठेवली आहे, असेही राऊत म्हणाले.

चुकून संपादक झाले आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती. यावर राऊत म्हणाले की, त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही. राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आमची सुरक्षा काढून घेतली. परंतु आमची सुरक्षा काढली तरी, काहीही फरक पडत नाही. आम्ही भीत नाही, सुरक्षेविना आम्ही महाराष्ट्रात फिरू शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान झालेला भाजपला चालत नाही, मग छत्रपती शिवरायांचा अपमान झालेला कसा चालतो? असा सवाल करून यावर भाजप काहीही बोलत नाही. छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याची भाजपमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यानंतर राष्ट्रीय प्रवक्ते सिंधाशू त्रिवेदी, राज्यातील पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी भाजप गप्प आहे, असा आरोप राऊत यांनी केला. छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे. रोज अपमान सुरू असताना ही कसली क्रांती आहे. महाराष्ट्राबद्दल भाजपला स्वाभिमान नसेल, तर कर्नाटकने सोडलेल्या पाण्यात त्यांनी जलसमाधी घ्यावी, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button