महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न: मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांचा बेळगाव दौरा लांबणीवर
पुढारी ऑनलाईन: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुनावणी आणि सीमाभागासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील आणि समन्वयक मंत्री शंभूराज देसाई ३ डिसेंबरला बेळगावला जाणार होते. मात्र, या दोन्ही मंत्र्यांचा बेळगांव दौरा पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून दिली आहे.
६ डिसेंबर रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही कार्यक्रमांना येण्याचा बेळगाव येथील आंबेडकरवादी संघटनांचा आग्रह आहे. त्यानुसार मी आणि समन्वयक मंत्री @shambhurajdesai आमचा ३ डिसेंबरचा बेळगाव प्रवास ६ डिसेंबरला करणार आहोत.@CMOMaharashtra
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 1, 2022
पाटील यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ३ डिसेंबरला बेळगावचा दौरा नियोजित होता. मात्र ६ डिसेंबर रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने येथील आंबेडकरवादी संघटनांनी काही कार्यक्रमांना येण्याचा आग्रह केला आहे. या कारणाने हा दौरा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील हालचाली वेगवान झाल्या आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील काही गावांवर दावा सांगितल्यानंतर गेले काही दिवस सीमाभागातील वातावरण तापले होते. आता सुनावणीही होणार असल्यामुळे राजकीय पातळीवरील घडामोडींनाही वेग आला आहे.