...म्हणून शपथ घेताना शिंदे गटातील मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेतले नाही
पुढारी ऑनलाईन डेस्क : राजभवन प्रशासनाकडून दिलेल्या फॉर्मेटमध्येच शपथ घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणून मंत्रीपदाची शपथ घेताना बाळासाहेबांचे नाव घेतले नाही, असा खुलासा मंत्री शंभूराज देसाई यांनी केला. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज ( दि.११ ) त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळास अभिवादन केले. यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून रोजी शपथ घेतली. यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधी पक्ष शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. अखेर दोन दिवसांपूर्वी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटातील ९ आमदार शपथबद्ध झाले; पण कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताना शिंदे गटातील मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेतले नाही. यावरून शिवसेनेच्या नेत्यांकडून शिवसेना आमचीच म्हणणाऱ्यांना बाळासाहेबांची आठवण झाली नाही का? अशी टीका करण्यात आली होती.
बाळासाहेबांचे नाव न घेण्याचे कारण शंभूराज देसाई यांनी सांगितले. ते म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमच्या ह्रदयात आहेत; पण मंत्रीपदाची शपथ घेताना प्रशासनाकडून दिलेल्या फॉर्मेटमध्येच शपथ घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. दिले आहे तेवढच वाचावे, इतर काही वाचू नये, अशा सूचना राजभवन प्रशासनाकडून दिल्या होत्या. बाळासाहेब ठाकरे हे आमचे श्रद्धास्थान आहेत.”
हेही वाचा :