Traffic in Thane : ठाण्यात वाहतूक कोंडी; विद्यार्थी, चाकरमान्यांचे हाल | पुढारी

Traffic in Thane : ठाण्यात वाहतूक कोंडी; विद्यार्थी, चाकरमान्यांचे हाल

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाणे शहरात आज (दि.८) पहाटेपासून वाहतूक कोंडीचा (Traffic in Thane) खेळखंडोबा झाला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मुंबई -नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अवघे २०० मीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना एक तासाचा कालावधी लागत होता. यामुळे सकाळच्या वेळी शाळेत जाणारे विद्यार्थी, कामावर जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.

ठाण्याहून भिवंडी, नाशिकच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने साकेत पूल ते माजिवडा नाकापासून घोडबंदर कासारवडवली नागला बंदरपर्यंत वाहतूक कोंडीत (Traffic in Thane) अडकली. याचवेळी भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर साकेत पूल ते भिवंडीतील रांजनोली नाका येथपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अवघ्या १५ ते २० मिनिटांचे अंतर पार करण्यास वाहनांना अंदाजे २ तास लागत होते. याचा अधिकचा फटका सकाळच्या वेळेस शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला अनेक विद्यार्थी रस्त्यातच अडकले होते. या वाहतूक कोंडीत रिक्षा आणि ठाणे परिवहन सेवेच्या बसेस, बेस्टच्या बसेस अडकल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.

मागील तीन दिवसांपासून ठाणे शहरात सतत पडत असलेल्या पावसाने आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे घोडबंदर मार्गांवरही बोरिवलीच्या दिशेच्या मार्गीकेवर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यातच जोरदार पाऊस झाल्याने येथून जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावला आहे. परिणामी या मार्गांवरही सकाळपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. महत्वाची बाब म्हणजे इतर वेळी रस्त्यावर उभे असणारे वाहतूक पोलीस कुठेच दिसून आले नाहीत. स्थानिक नागरी आणि काही रिक्षाचालक रस्त्यावर उतरून ही वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत होते. त्यातही मधून मधून पावसाच्या सरी बरसत असल्याने अडचणीत आणखीन भर पडत होती. मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत न घेतल्याने रस्त्यावरील खड्डे भरण्यातही संबंधित यंत्रणांना अडचण येत आहे.

घोडबंदर मार्गांवरून ठाणे, मुंबई, कल्याण, नवी मुंबई आदी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक कामावर जात असतात. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना कार्यालयात पोहोचण्यास उशीर झाला. तर काही जणांनी पुन्हा घरी जाणेच पसंद केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button