sharad pawar : जिल्हा परिषदा या नेतृत्व तयार करणाऱ्या शाळा : शरद पवार
पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदा या नेतृत्व तयार करणाऱ्या शाळा आहेत. पुणे जिल्हा परिषदेमधून २४ जिल्हा परिषद सदस्य आमदार, तर ५ सदस्य मंत्री झाले आहेत, ही गौरवास्पद बाब आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवीन नेतृत्वाची फळी राज्यात निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (sharad pawar) यांनी केले. पुणे जिल्हा परिषदेच्या हीरक महोत्सव समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते (sharad pawar) बोलत होते.
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार अशोक पवार, चेतन तुपे, अतुन बेनके, सुनील टिंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. कार्यक्रमात प्रोसेस मॅपींग या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा विशेष गौरव करण्यात आला.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी १९६२ साली स्थानिक स्वराज्य संस्था अस्तिवात आल्या. तेव्हापासून पुणे जिल्हा परिषदेने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पायाभूत सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास झाला पाहीजे. त्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असतात.
गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, पंचायतराज व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला गती मिळते. जिल्हा परिषदा हे उद्याचे नेतृत्व घडविणाऱ्या संस्था आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक चांगले नेते राज्याला मिळाले. वाढत्या लोकसंख्येसोबत नागरिकांच्या अपेक्षाही वाढत आहेत. त्यादृष्टीने विकासाच्या योजना राबविण्याची गरज आहे.
जिल्हा परिषद सर्व घटकांना विकासाचा मार्ग दाखविणारी संस्था आहे. राज्य शासन दरवर्षी पंचायतराज अभियान राबवत असून चांगले काम करणाऱ्या संस्थाचा गौरव करण्यात येतो. ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेत जिल्हा परिषदेची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येतात. पुणे जिल्हा परिषदेने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला.
हेही वाचलंत का ?