रेल्‍वेत परदेशी महिलेचा विनयभंग, तीन वर्षानंतर संशयितास अटक | पुढारी

रेल्‍वेत परदेशी महिलेचा विनयभंग, तीन वर्षानंतर संशयितास अटक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा: भारतात फिरायला आलेल्या परदेशी महिलेचा विनयभंग  केल्‍याप्रकरणी तरुणास कल्याण रेल्वे पोलीसांनी अटक केली आहे. साहीश टी असे त्‍याचे नाव असून,  आर्मीच्या केरळ युनिटमध्ये ताे  कार्यरत आहे.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी परदेशी महिला गोवा – दिली निजामुद्दीन  ट्रेनने प्रवास करत होती. यावेळी रात्री साडेअकराच्या सुमारास कल्याण -कसारा दरम्यान साहिश याने त्या महिलेसोबत अश्लील वर्तन केलं. तिने हा सर्व प्रकार भारतीय दूतावासाला सांगून तक्रार नोंदवली होती. अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ही तक्रार कल्याण जीआरपीने दाखल करून घेतली.

कोणतीही माहिती नसल्याने महिलेला फोन लावून त्या व्यक्तीचे वर्णन विचारण्यात आले होते. त्यानंतर समाजमाध्यमाचा आधार घेत पोलिसांनी साहीश टी यांना शोधून काढले.  साहीश याला पोलिसांच्या हालचालीची माहिती मिळताच त्याने कल्याण न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला. न्यायालयाने तो फेटाळल्याने साहीश याने उच्च न्यायालयात धाव घेतली.

उच्च न्यायालयाने साहिश याचा अटकपूर्व जामीन फेटाळला. याच दरम्यान साहिश कल्याणमध्ये नातेवाईकांकडे लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कल्याण जीआरपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या पथकाने त्याला अटक केली.

हेही वाचलंत का? 

Back to top button