टीम इंडियासाठी गूड न्‍यूज : शुभमन गिल अहमदाबादमध्‍ये दाखल | पुढारी

टीम इंडियासाठी गूड न्‍यूज : शुभमन गिल अहमदाबादमध्‍ये दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वन-डे (एकदिवसीय) विश्‍वचषक स्‍पर्धेतील टीम इंडियाची वाटचाल दमदार सुरु आहे. पहिले दोन सामने जिंकत भारताने आघाडी घेतली आहे. अशातच आता टीम इंडियासाठी एक गूड न्‍यूज आहे. भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill ) बुधवारी रात्री अहमदाबादला पोहोचला आहे. डेंग्यूची लागण झाल्‍यामुळे शुभमन विश्‍वचषक स्‍पर्धेतील पहिल्‍या दाेन सामन्‍याला मुकला हाेता. आता शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्‍या सामन्‍यात ताे खेळेल अशी क्रिकेटप्रेमींना आशा आहे.

Shubman Gill पाकिस्‍तान विरुद्धच्‍या सामन्‍यात खेळणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला होणार आहे. शुभमन गिलकडे फिटनेससाठी आणखी दोन दिवस आहेत. तो तंदुरुस्त झाला तर पाकिस्‍तान विरुद्धच्‍या सामन्‍यात तो खेळणे निश्चित आहे. शुभमनच्‍या अनुपस्‍थितीत इशान किशन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्‍या सामन्‍यात संधी देण्‍यात आलीहोती. मात्र तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता आणि अफगाणिस्तानविरुद्धही त्याची सुरुवात संथ होती. त्‍यामुळे शुभमन तंदुरुस्त असल्‍यास त्‍याचे संघातील स्‍थान पक्‍के मानले जात आहे.

शुभमन अहमदाबादला पोहोचल्‍याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो मास्‍क घालून सुरक्षा कर्मचार्‍यांसोबत अहमदाबाद विमानतळावरून निघताना दिसत आहे. गिलशिवाय पाकिस्तानचा संघही अहमदाबादला पोहोचला आहे. बुधवारी टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्ध मोठा विजय मिळवला आहे. आता भारतीय खेळाडूही अहमदाबादमध्ये पोहचले आहेत.

शुभमनची प्रकृती कशी आहे?

शुभमन गिल अहमदाबाद विमानतळावर अगदी सामान्य दिसत होता. डेंग्यूतून तो पूर्णपणे बरा झाल्‍याचे दिसत होते. मात्र सामना खेळण्‍यापूर्वी त्‍याला फिटनेसची खात्री द्‍यावी लागणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो खेळेल अशी पूर्ण आशा आहे. डेंग्यूपासून बरे होण्यासाठी साधारणपणे एक आठवडा लागतो आणि गिलसारखे खेळाडू लवकर बरे होऊ शकतात कारण तो आधीच तंदुरुस्त आहे. आशिया चषकापूर्वी झालेल्या यो-यो चाचणीत त्याचा स्कोअर सर्वाधिक होता.

शुभमन गिल हा भारताकडून यावर्षी वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 20 डावात 1230 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ७२.३५ आणि स्ट्राइक रेट १०५.०३ आहे. त्याने या वर्षी वनडेत द्विशतकही झळकावले आहे. शुभमन गिल हा विश्वचषकात भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा फलंदाज आहे. टीम इंडियासाठी तंदुरुस्त पुनरागमन करणे खूप महत्त्वाचे आहे. अहमदाबादच्या मैदानात गिलचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. अशा स्थितीत त्याचे संघात पुनरागमन ही भारतासाठी अत्यंत आनंददायी ठरणार आहे.

हेही वाचा :

 

Back to top button