मणिपूरमध्येही ‘भगवा’च!, मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह यांची मेहनत फळाला | पुढारी

मणिपूरमध्येही 'भगवा'च!, मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह यांची मेहनत फळाला

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य मणिपूरमध्ये सत्ता कायम राखण्यात भारतीय जनता पार्टीला यश आले आहे. यंदा कुठल्याही प्रादेशिक पक्षाची मदत न घेता स्वबळावर सरकार स्थापन करण्याच्या दिशेने भाजप आणि मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी केलेली मेहनत फळाला आल्याचे निवडणूक निकालानंतर जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष शारदा देवी यांचा देखील या विजयामध्ये सिंहाचा वाटा आहे. संध्याकाळपर्यंत हाती आलेल्या निकालानूसार भाजप ने २७ जागांवर विजय मिळवला. तर, ५ जागांवर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. यंदा भाजपच्या पारड्यात अधिकच्या ९ जागा पडल्या आहेत. काँग्रेस ला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले असून त्यांनी २१ जागा गमावल्या आहेत.

म्यानमार लगत असलेले हे राज्य अशांत तसेच बरेच संवेदनशील आहे. राज्याला त्यामुळे बंडखोरांच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्यात आर्म फोर्स स्पेशल पॉवर अँक्ट, १९५८ (एएफएसपीए) लागू करण्यात आला आहे. सत्तेत सहभागी भाजपच्या मित्रपक्षांनी निवडणुकीपूर्वी हा कायदा मागे घेण्याची मागणी केली होती. अशात निवडणुकीत हा मुख्य मुद्दा होण्याची शक्यता होती. पंरतु, भाजप विकासाच्या राजकारणाला केंद्रित करीत निवडणुकीला सामोरे गेले होते.

मणिपूर मध्ये जोडतोडीचे तसेच पक्षांतराचे राजकारण केले जाते. नेहमी निवडणुकीच्या अगोदर राजकीय नेते पक्ष बदल करून राजकीय पोळी भाजून घेतात. प्रादेशिक पक्ष देखील फायदे लक्षात घेवून राष्ट्रीय पक्षांना समर्थन देतात. अशात राष्ट्रीय पक्ष देखील त्यांना फार महत्व देत नाहीत.त्यामुळे यंदा स्पष्ट बहुमत मिळवण्याचे आव्हान भाजप नेतृत्वासमोर होते.

या निवडणुकीत स्वबळावर सत्तास्थापन करण्याच्या स्थितीपर्यंत पक्षाला पोहचवण्यासाठी एन.बीरेन सिंह यांच्या चेहर्याची भाजपला बरीच मदत झाल्याचे निकालावरून अधोरेखित झाले आहे. शिवाय पक्षाने राज्याचे नेतृत्व ए.शारदा देवी यांच्या कडे सोपवले होते. मणिपूर च्या दैनंदिन जीवनात महिलांची भूमिका महत्वाची आहे. राजकीय दशा आणि दिशा निश्चित करण्यात महिलांची भूमिका मोठी असते. अशात शारदा देवी यांच्या नेतृत्वाची आणि संघटन कौशल्याची भाजपला मदत झाली. प्रत्येक मतदार संघात केवळ ३० हजार मतदार आहेत.अशात भाजपने ४० जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष ठेवून प्रत्येक मतदार संघात संघटनात्मक बांधणी केली होती. याचा भाजपला बराच फायदा झाला.

भाजपला समर्थन देवू इच्छिणार्या पक्षांचे स्वागत आहे, असे प्रदेशाध्यक्ष ए.शारदा यांनी जाहीर केले असले तरी पक्षाच्या नियमानूसार संसदीय मंडळात यासंबंधी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल.दरम्यान,विद्यमान मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह यांनी हीनगंग विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेसचे पी.शरतचंद्र सिंह यांचा पराभव केला.२०१७ च्या निवडणुकीत देखील भाजपले मणिपूरमध्ये सत्तेवर येत चमत्कार करून दाखवला होता.यापूर्वी झालेल्या दोन विधानसभा निवडणुकीतही भाजपने आपले नशीब आजमावले होते.पंरतु, त्यांना यश मिळाले नव्हते. गेल्या निवडणुकीच्या चार महिन्यापूर्वी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले बीरेन सिंह यांच्या बळावर तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपला एक प्रमुख पर्याय म्हणून समोर आणले होते.

६० विधानसभेच्या जागा असलेल्या या राज्यात २०१७ मध्ये सर्वात मोठा पक्ष असून देखील कॉंग्रेसला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले होते. प्रादेशिक पक्षांना हाताशी घेऊन भाजपने कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले होते. मणिपूरच्या निकालाच्या निमित्ताने ईशान्य भारतातील आणखी एक महत्वाच्या राज्यातून कॉंग्रेसचा जनाधार कमी होत असल्याचे दिसून येत आहे.सिंह यांनी त्यांच्या दांडग्या जनसंपर्काचा वापर करीत भाजपला अधिक बळकट करीत २१ जागांवर विजयश्री मिळवून देत भाजपला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवला होते. प्रादेशिक पक्षांना भाजपकडे वळवून सत्तास्थापन करण्यात ते यशस्वी झाले होते. केवळ चार महिन्याच्या मेहनतीच्या बळावर १५ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसला सत्तेपासून त्यांनी दूर सारले होते.यंदा काँग्रेस सह तृणमूल काँग्रेस चे आव्हान भाजप समोर होते.भाजप ने ४० जागांवर विजयी होण्याचे लक्ष ठेवले होते. काँग्रेस जरी कमकुवत झाली असली तरी तृणमुल ने चांगला जम बसवला होता. अशात भाजप चा सामना काँग्रेस सह टीएमसी सोबत होता. पंरतु, यंदा टीएमसीला खातेही उघडता आले नाही.

हेही वाचलतं का?

Back to top button