Uddhav Thackeray on Nitin Gadkari | ‘भाजप’मध्ये तुमचा अपमान, ‘महाविकास आघाडी’त या, ठाकरेंची गडकरींना ऑफर | पुढारी

Uddhav Thackeray on Nitin Gadkari | 'भाजप'मध्ये तुमचा अपमान, 'महाविकास आघाडी'त या, ठाकरेंची गडकरींना ऑफर

पुढारी ऑनलाईन : शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजप सोडून महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिली आहे. नितीन गडकरी यांचा ‘अपमान’ होत असल्यास त्यांनी भाजपला सोडावे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील विरोधकांचा विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (Uddhav Thackeray on Nitin Gadkari)

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील सभेत बोलताना ठाकरे म्हणाले की, (काँग्रेसचे माजी नेते) कृपाशंकर सिंह, ज्यांना भाजपने एकेकाळी (कथित भ्रष्टाचारावरून) लक्ष्य केले होते, त्यांच्यासारखे लोक भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत. पण गडकरींचे त्यात नाव नाही.

“मी हे दोन दिवसांपूर्वीच गडकरींना सांगितले होते, आणि मी त्याचा पुनरुच्चार करत आहे की तुमचा अपमान होत असेल, तर भाजप सोडा आणि महाविकास आघाडीत सामील व्हा. आम्ही तुमचा विजय निश्चित करु. आमचे सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही तुम्हाला मंत्रीपद देऊ आणि ते अधिकार असलेले पद असेल,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात ठाकरे यांच्या गडकरींना विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याच्या ऑफरला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंची खिल्ली उडवली होती. त्यांनी म्हटले होते की हे तर रस्त्यावरील एका माणसाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनवण्याची ऑफर दिल्यासारखे होते.

गडकरी हे भाजपचे प्रमुख नेते आहेत. पण पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे नव्हती. कारण भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली नव्हती, असे फडणवीसांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, ठाकरे यांनी नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्यातील नियमांच्या अधिसूचनेला “निवडणूक जुमला’ म्हटले आहे.

हिंदु, शीख, पारशी आणि इतरांचे (शेजारील देशांतून) भारतात स्वागत आहे. पण लवकरच निवडणुका जाहीर होणार असल्याने या अधिसूचनेची वेळ संशयास्पद होती, असे ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray on Nitin Gadkari)

‘काश्मिरी पंडित अजूनही काश्मीरमध्ये परतले नाहीत’

कलम ३७० रद्द करून चार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या नाहीत आणि काश्मिरी पंडित अजूनही काश्मीरमध्ये त्यांच्या घरी परतले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. भाजपने आधी काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये परत आणावे आणि नंतरच CAA कायदा लागू करावा, असे ठाकरे म्हणाले.

 हे ही वाचा :

Back to top button