पुण्याला हवे विकासाचे व्हिजन; आ. धंगेकरांचे दै. पुढारी कार्यालयाच्या भेटी दरम्यान वक्तव्य
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील मेट्रोचे जाळे हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. केवळ मेट्रो करून उपयोगाची नाही, मेट्रोचे जाळे वाढविण्याबरोबरच मेट्रो स्टेशनपर्यंत नागरिकांना पोहोचण्यासाठी रस्त्यांची कनेक्टीव्हिटी गरजेची आहे. वाढती लोकसंख्या, वाढत्या बाजारपेठांचा विचार करून भुयारी मार्गासारख्या बाबींच्या नियोजनाची पुण्याला गरज आहे. पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असून, टाटाच्या धरणातून पुण्याला पाणी आणण्याची आवश्यकता आहे. हे पुण्याच्या विकासाचे व्हिजन ठेवून भविष्यात काम करणार आहे, असे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
धंगेकर यांनी दैनिक पुढारीच्या कार्यालयाला मंगळवारी (दि.16) सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, पुढारीचे निवासी संपादक सुनील माळी, मुख्य बातमीदार ज्ञानेश्वर बिजले, रमेश अय्यंगार उपस्थित होते. या भेटीत रवींद्र धंगेकर यांनी संपादकीय विभागातील प्रतिनिधींशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. धंगेकर म्हणाले, पुण्यात नदीसुधार योजना राबविण्यात येत आहे, तिचा काहीही उपयोग नाही. स्मार्ट सिटीसारखा उपक्रम गुंडाळावा लागला. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पुण्याला जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियान (जेएनएनयूआरएम) मधून साडेतीन हजार कोटी रुपये दिले होते. पुण्यात प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक असल्याचा प्रचार भाजपचे लोक करतात, भाजपचे लोक हे जाणीवपूर्वक करतात.
परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्या लाट नाही. लाट असती तर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अजित पवार, अशोक चव्हाण यांना पक्षात घेतले नसते. कंपनी चांगली सुरू असताना कोणी भागीदार शोधत नसल्याची टिप्पणीही धंगेकर यांनी केली. शेतकरी त्रस्त आहेत. ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सहानुभूती मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना कालावधीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चांगले कामे केले, त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार पुण्यात कामे झाली.
या प्रश्नांवर बोललोय, पुढेही बोलणार…
मी विधानसभेत गेल्यानंतर अमली पदार्थावर बोललो, गुन्हेगारी, पुण्याची कोयता गँग, मेट्रो, पर्यावरणावर बोललो. टेकड्या वाचविण्यासाठी आवाज उठवला. लोकसभेत देखील पर्यावरणावर सतत बोलत राहील. पायाभूत सुविधांवर बोलत राहील. पुरंदर विमानतळ आणि मेट्रोचे जाळे विस्तारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ. रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
हेही वाचा