जुन्या भांडणाच्या रागातून चुलत भावाचा खून, इंदापूर तालुक्यातील कळंब येथील घटना | पुढारी

जुन्या भांडणाच्या रागातून चुलत भावाचा खून, इंदापूर तालुक्यातील कळंब येथील घटना

वालचंदनगर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्यातील कळंब हद्दीतील जाधववस्ती येथे भावकीतील जुन्या भांडणाचा राग मनात धरून चुलत भावाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. हनुमंत सर्जेराव जाधव (वय ३६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नी रेश्मा हनुमंत जाधव (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सन २०१२ मध्ये फिर्यादीच्या सासु कमल जाधव यांना चुलत दीर दत्तात्रय जाधव यांनी मारहाण केल्यामुळे त्या वेळी पोलिसात तक्रार दाखल होती. त्यानंतर हा वाद घरातील दोन्हीकडील व्यक्तींनी समझोत्याने न्यायालयामध्ये मिटवला होता. मात्र, दत्तात्रय हरिदास जाधव हा येता-जाता फिर्यादीच्या घरातील लोकांकडे विनाकारण रागाने पाहत असे.

दरम्यान, बुधवारी (दि. २३) सकाळी फिर्यादीचे पती हनुमंत हे आपल्या विहिरीवर विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले असता दत्तात्रय जाधव याने पाठीमागून जाऊन हनुमंत यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यामध्ये हनुमंत गंभीर जखमी झाले. हा प्रकार पाहून कुटुंबातील व्यक्तींनी घटनास्थळाकडे धाव घेतल्याने पाहून दत्तात्रय याने हनुमंत यांना कोरड्या विहिरीत ढकलून देऊन पळ काढला. या वेळी कुटुंबातील व्यक्तींनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी येऊन हनुमंत यांना विहिरीतून बाहेर काढून उपचारासाठी नेले. मात्र तत्पूर्वीच हनुमंत यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहेत.

हेही वाचा:

यंदा दगडूशेठ गणपती दु. ४ वा. विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी

नाशिक पुणे रस्त्यावर राष्ट्रवादीचा रास्ता रोको, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

पुणे : विद्युत वाहनांसाठी वीज विक्री तिप्पट

 

Back to top button