कालठण : उजनी धरणाची पाणीस्थिती वजा 20 टक्के | पुढारी

कालठण : उजनी धरणाची पाणीस्थिती वजा 20 टक्के

कालठण(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सोलापूरसह पुणे, अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाची पाणीस्थिती वजा 20 अशी असून, मृतसाठ्यातील 10.29 टीएमसी पाण्याचा वापर मागील जवळपास तेरा ते चौदा दिवसांत झाला आहे. अद्यापही नदीत व कालव्यात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. या वर्षी उजनी धरणातील पाणी झपाट्याने कमी झाले असून, गतवर्षी याच काळात उजनी धरण उपयुक्त पातळीत होते. यंदा ते वजा 19.21 टक्के अशा स्थितीत आहे.

उन्हाळा हंगामात कालवा सलग सुरू ठेवल्याने पाण्याचा वापर जास्त प्रमाणात झाला आहे. त्याचबरोबर वाढत्या तीव्र उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन, उजनी जलाशयावरील उपसा, तसेच विविध योजनांमध्ये सोडलेले मुबलक पाणी यामुळे उजनीतील उपयुक्त जलसाठा हा 6 मे रोजी संपला होता. यानंतर आता उजनी धरणाचा प्रवास हा मृत साठ्यात सुरू आहे.

उजनी धरणातून कालव्यात सोडले जात असलेले पाणी हळूहळू कमी करण्याची प्रक्रिया सुरूअसून, तीन हजार क्युसेकचा विसर्ग कमी करून तो आता 1900 क्युसेकवर आणण्यात आला आहे. तर, भीमा सिना जोडकालव्यात केवळ 240 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. 11 मेपासून उजनीतून भीमा नदीत सोलापूरसह अन्य योजनांसाठी पाणी सोडले जात आहे. उजनी धरणात सध्या एकूण पाणीसाठा मृतसाठा 53 टीएमसी इतका शिल्लक आहे. सध्या वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढले आहे.

Back to top button