Nashik Onion News : कांदा प्रश्नी उद्या महत्वाची बैठक, अवघ्या जिल्ह्याचे लागले लक्ष
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कांद्यावरील ४० टक्के निर्यातमूल्य रद्द करावे, बाजार समित्यांमधील कर कमी करावे आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (दि. २६) मुंबईत बैठक बोलविली आहे. या बैठकीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लिलावात सहभागी न हाेण्याच्या भूमिकेवर व्यापारी ठाम असल्याने बाजार समित्यांमध्ये व्यवहार अद्यापही ठप्पच आहेत. (Nashik Onion News)
संबधित बातम्या :
- नाशिक जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर; कांदा खरेदीबाबत एनसीसीएफ- नाफेडची करणार चौकशी
- Mumbai News : बेडरूममध्ये घुसून सुनेवर सासऱ्याचा लैंगिक अत्याचार
- बचतीतील घटते प्रमाण!
केंद्र सरकारने नाफेड व एनसीसीएफद्वारे खरेदी केलेला कांदा देशांतर्गत घाऊक बाजारात न आणता तो थेट रेशनवर उपलब्ध करून द्यावा, देशांतर्गत कांदा वाहतुकीत ५० टक्के सबसिडी, तर निर्यातीमध्येही ५ टक्के सवलत द्यावी, अन्य राज्यांप्रमाणे बाजार समित्यांमध्ये आडत लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. मंगळवार (दि. १९) पासून कांदा व्यापारी बाजार समित्यांमधील लिलावात सहभागी होत नसल्याने कांदा व्यवहार ठप्प झाले आहेत. व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर ताेडगा काढण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी २१ तारखेला बैठक घेतली. मात्र, व्यापाऱ्यांच्या बहुतांश मागण्या या केंद्र व राज्यस्तरावरील धोरणात्मक बाब असल्याने ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी संपाचा पवित्रा कायम ठेवला आहे. (Nashik Onion News)
व्यापाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (दि. २६) बैठक बोलविली आहे. बैठकीत व्यापारी व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होेणार आहे. त्यात मागण्यांबाबत काय तोडगा निघतो, यावर बंदचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या प्रश्नी सकारात्मक निर्णय हाेऊन कांदा व्यवहार पूर्ववत होवाे, अशीच अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे. (Nashik Onion News)
…तर बेमुदत बंद
येवल्यात दोन दिवसांपूर्वी कांदा व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व सभासदांची बैठक झाली. यात मंगळवारी (दि. २६) होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे झाल्यास जिल्ह्यासह राज्य व देशपातळीवर कांद्यांची कोंडी निर्माण होईल.
हेही वाचा :
अहमदनगर : धनगर आरक्षणाचा ठोस निर्णय घ्या; अन्यथा राज्यभर चक्काजाम आंदोलन
वर्धा : अल्लीपूर येथील युवतीच्या हत्येप्रकरणी ३६ तासांत आरोपीस अटक