अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत - नरहरी झिरवळ
नाशिक, पुढारी वृत्तसेवा : सध्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लांब असल्या तरी आतापासूनच भावी मुख्यमंत्री पदासाठी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. रविवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून पोस्टरबाजी सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री झाले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होईल? या चर्चेला उधान आले आहे.
आमदार नरहरी झिरवळ यांनी अजित पवार यांच्या गौरवोद्गगार काढत त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी सांगितले. राज्यभरातून येणाऱ्या लोकांना अजित पवार यांच्याबद्दल काय वाटतं तेही नरहरी झिरवळ यांनी बोलून दाखवले. यावेळी ते म्हणाले की, बरेच लोकं म्हणतात की, दादा गरम आहेत. मात्र, दादा कामाच्या बाबतीत आग्रही असतात. त्यामुळे त्यांना भेटायचे म्हणजे अनेकांना त्यांचा धाक वाटतो. कामाच्या बाबतीत अजित पवार म्हणजे एक प्रकारची शिस्त आहे. त्यामुळे कोणतेही काम करताना अजित पवार यांच्याहीपेक्षा आपण स्ट्रिक्ट झाले पाहिजे, असे मतही त्यांना यावेळी व्यक्त केले.