नाशिक : स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे योगदान महत्वपूर्ण : राजाराम पाटील पानगव्हाणे
नाशिक (निफाड): पुढारी वृत्तसेवा
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचे फार मोठे योगदान आहे. काँग्रेसची 1885 मध्ये स्थापना झाल्यापासून काँग्रेसजन स्वातंत्र्यलढ्यात तनमनधनाने सामील झाले. सत्तर वर्षात काँग्रेसने देशाच्या जडणघडणीचे व बांधणीचे कार्य केले हे विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पाटील पानगव्हाणे यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने देशासाठी स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या क्रांतीकारकांना अभिवादन करण्यासाठी प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन महाराष्ट्रभर करण्यात येत असून निफाड तालुका काँग्रेस समितीच्या वतीनेही या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेला संबोधित करताना ते बोलत होते. पदयात्रेची सुरुवात नैताळे येथून करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रध्वज हातात घेऊन नैताळे येथील ग्रामस्थ तसेच काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी या पदयात्रेत सहभागी झाले. यात्रेचे स्वागत शिवरे फाटा येथे रघुदादा सानप यांच्या वतीने करण्यात आले. निफाडला शांतीनगर चौफुली येथे पदयात्रेचे स्वागत नगरसेविका पल्लवी जंगम यांनी केले. निफाड पंचायत समितीच्या आवारातील हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, समाज सुधारक न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला. निफाड तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष मधुकर शेलार यांनी प्रास्ताविक केले. तसेच गुणवंतराव होळकर व मधुकर राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा समितीचे उपाध्यक्ष गुणवंतराव होळकर, सचिन होळकर, भैय्या देशमुख, युवक काँग्रेसचे महासचिव गौरव पानगव्हाणे, निफाड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे, स्वप्नील बिनायकिया, रघुभाऊ कुंदे, सुनील निकाळे, जिल्हा उद्योजक आघाडीचे सोनवणे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुहास सुरळीकर यांनी सूत्रसंचालन केले. राजेश लोखंडे यांनी आभार मानले.